
फोटो सौजन्य- chatgpt
दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ संत सर्वज्ञ दासोपंत हे मराठी संतसाहित्यातील अत्यंत महान आणि विपुल लेखन करणारे संत-कवी होते. त्यांचा जन्म इ.स. १५५१ मध्ये बेदर परगण्यातील नारायणपेठ येथे झाला. वडील दिगंबरपंत देशपांडे हे बादशहाच्या दरबारात कमाविसदार होते, तर आईचे नाव पार्वतीबाई होते. दासोपंत लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. असे सांगितले जाते की, वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी चारही वेद मुखोद्गत म्हणून दाखविले. त्यांची दत्त भक्ती, गरिबांच्या प्रती करुणा होती.
दासोपंत हे दत्तात्रेय यांचे परम भक्त होते. त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग त्यांच्या भक्तीचा आणि वैराग्याचा आधार ठरला. राज्यात दुष्काळ पडल्यावर त्यांच्या वडिलांनी लहानशा दासोच्या सांगण्यावरून सरकारी कोठारातील धान्य गरिबांना वाटले. ही बातमी बादशहाला समजली. त्यामुळे बादशहाने दिगंबरपंतांना शिक्षा म्हणून दोन लाख सुवर्णमुद्रा भरण्याचा आदेश दिला आणि दासोपंतांना ओलीस ठेवले. मुद्रांची रक्कम भरली नाही तर दासोपंतांना धर्मांतर करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला. महिनाभराच्या कालावधी एवढ्या मोहरा कुठून आणणार असा यक्ष प्रश्न दासोपंतांच्या वडिलांना पडला ते चिंतेत होत. इकडे दासोही चिंतेत होता पण. दासोपंत नजरकैदेत असतानाही रोज पूजा, जप आणि दत्तात्रेय यांचे स्मरण करत असत. आपली भगवंताच्या प्रती श्रद्धा डळमळीत होऊ दिली नाही. भगवंत काहीतरी करेल हा दृढ विश्वास होता.
शेवटच्या दिवशी राजाचा दरबार भरला. दाभोळच्या आई वडिलांपासून सर्वच चिंतेत होते. पण दरबारात चमत्कार घडला. “दत्ताजी पाडेवार” नावाने एक व्यक्ती दरबारात आली आणि पाच लाख सुवर्णमुद्रा भरून गेली. दासोपंतांना नंतर समजले की, तो प्रत्यक्ष श्रीदत्तात्रेयांचा अवतार होता. या घटनेनंतर त्यांनी संसाराचा त्याग केला आणि अध्यात्ममार्ग स्वीकारला.
दासोपंतांनी माहूरगड येथे 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर ते अंबाजोगाई येथे स्थायिक झाले. येथे त्यांनी अखंड लेखनकार्य केले. मराठी भाषेत सर्वाधिक लेखन करणारे संत म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या रचनांची संख्या सुमारे पाच लाख ओव्यांपर्यंत मानली जाते. त्यांनी भक्ती, वेदान्त, योग, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांवर विपुल लेखन केले. “दिगंबरानुचर” या नावानेही त्यांनी काही रचना केल्या.
दासोपंतांच्या साहित्याची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती म्हणजे “पासोडी”. सुमारे ४० फूट लांब आणि ४ फूट रुंद अशा कापडावर त्यांनी वेदान्तातील पंचीकरण विषय चित्रांच्या माध्यमातून मांडला. यात अश्वत्थवृक्ष, सर्प, पंचकोशचक्र, श्रीदत्तमूर्ती, शंख, चक्र आणि हंस यांसारख्या चित्रांचा सुंदर वापर केला आहे. ही पासोडी केवळ धार्मिक नव्हे तर कलात्मक आणि तत्त्वज्ञानात्मक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे दासोपंत हे उत्कृष्ट चित्रकार आणि विचारवंतही होते हे दिसून येते.
दासो दिगंबर देशपांडे हे संत एकनाथ महाराज यांचे समकालीन होते. मराठी संतपरंपरेत त्यांनी भक्ती आणि वेदान्त यांचा सुंदर संगम घडवून आणला. माघ वद्य षष्ठी, शके १५३७ रोजी त्यांनी समाधी घेतली. त्यांच्या साहित्याने आणि भक्तीपर कार्याने मराठी संस्कृतीला अमूल्य असा आध्यात्मिक वारसा दिला आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: संत दासोपंत हे मराठी संतसाहित्यातील महान संत-कवी आणि श्री दत्तात्रेय यांचे परम भक्त होते.
Ans: दुष्काळाच्या काळात त्यांच्या वडिलांनी सरकारी धान्य गरीबांना वाटले. त्यामुळे बादशहाने मोठा दंड ठोठावला आणि दासोपंतांना ओलीस ठेवले
Ans: कथेनुसार “दत्ताजी पाडेवार” नावाने एक व्यक्ती दरबारात आली आणि सुवर्णमुद्रा भरून दासोपंतांची सुटका केली. भक्तांच्या श्रद्धेनुसार ते स्वतः श्रीदत्तात्रेय होते.