
फोटो सौजन्य- pinterest
श्रीराम भक्त हनुमान म्हणजे साक्षात संकटमोचक! त्याची पूजा आणि उपासना केल्यावर जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. गणपतीला दूर्वा, महादेवाला बेलाची पाने, विठ्ठलाला तुळशीची पाने अर्पण केली जातात तशी हनुमानाच्या पूजेत रुईची पाने, तेल, शेंदूर अर्पण केले जाते. पण हे का अर्पण केले जातात तुम्हाला माहीत आहे का? तर जाणून घेऊया या गोष्टी अर्पण करण्याची काय आहे परंपरा.
हनुमानाला शेंदूर, तेल आणि रुईची पाने अर्पण करणे ही भक्ती, शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. शेंदूर रामभक्तीचे, तेल वेदनामुक्तीचे (भरताच्या बाणाने झालेल्या जखमा) आणि रुईची पाने (जी हनुमानजीला प्रिय आहेत) शीतलता व गणेशकृपेसाठी वाहिली जातात. या गोष्टी हनुमानाच्या मूर्तीमध्ये ऊर्जा जागृत करतात.
हनुमंताला तेल, रुई आणि शेंदूर वाहिला जाते, तसेच पंजिरीचा प्रसाद दिला जातो. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो. अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते. भजन, कीर्तन असते. जन्मवेळ झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते. तसेच हनुमंताचा जन्मवार असलेल्या दिवशी म्हणजेच शनिवारी त्याला शेंदूर, तेल, रुईची पानांचे तोरण अर्पण केले जाते.
दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल घालतात. त्यासंबंधी अशी एक कथा आहे की, इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तिमुळे लक्ष्मण मूर्च्छित होऊन पडला होता. त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले. परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्त्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला. यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रुढी पडली.
हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते. हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम गणेशभक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी, इतकेच नव्हे, तर त्याला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या किंवा रुईच्या पानांची माळ घालीत असे. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच तो अकरावा रुद्र असल्याने अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली.
हनुमानाला शेंदूर लावण्यामागेही दोन कथा सांगितल्या जातात. भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भाळी कुंकुम शेंदुर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि `माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय?’ असे हनुमंताने सीतामाईला विचारले. ‘असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल’ असे सीतामाईने हनुमानाला सांगितले, तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्रांचे आयुष्य वाढावे, या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागला.
अहिरावण-महिरावण नामक दोन मायावी राक्षसांनी रामलक्ष्मणांना कपटाने पाताळनगरीत नेले. ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते. ऐनवेळी हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम व लक्ष्मणाची सुटका केली. या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामींनी मारुती स्तोत्रात केले आहे.
अशा हनुमंताच्या जयंतीच्या दिवशी तसेच मंगळवारी व शनिवारी हनुमंताच्या मंदिरात जाऊन तेल, शेंदूर व रूईच्या पानांचा हार घालावा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: पौराणिक कथेनुसार, युद्धाच्या वेळी जखमी झाल्यावर तेल लावल्याने वेदना कमी झाल्या. त्यामुळे तेल अर्पण करणे हे वेदनामुक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
Ans: भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर होतात, मानसिक शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.
Ans: Hanuman Jayanti दिवशी पूजा केल्यास विशेष पुण्य मिळते आणि हनुमानांची कृपा लवकर प्राप्त होते, अशी मान्यता आहे.