
वैशालीनगराची नगरवधू
बुद्धांच्या समकालीन काळात आजच्या बिहारमधील वैशालीनगर हे एक मोठं साम्राज्यच होतं. त्यावेळी या ठिकाणी राजे महाराजांचं वास्तव्य जास्त होतं. आणि याच वैशालीनगरात होती ती एक सौंदर्यवती. जिच्या सौैंदर्याची किर्ती सर्वदूर पसरली होती. या सौंदर्यवतीचा जन्म आंब्याच्या राईत झाला आणि म्हणून तिचं नाव आम्रपाली ठेवण्यात आलं. आम्रपालीचं सौैंदर्य विलक्षण होतं. पंचक्रोशीतल्या कोणत्याही स्त्रीची तिच्याशी तुलना करणं शक्य नव्हतं. आम्रपाली जशी वयात आली तसं हेच सौंदर्य तिच्या आयुष्याला लागलेला श्राप आहे हे तिला कळून चुकलं.
गणिका ते भिख्खुणी कसा होता आम्रपालीचा प्रवास ?
आम्रपालीला मिळवण्यासाठी मोठ्या मोठ्या राज्यातील राजांनी युद्ध करण्यास देखील मागेपुढे पाहिलं नाही. त्यामुळे आम्रपालीने कोणाशीही लग्न केलं असतं तरी वैशालीनगराला त्याचा धोका होता. म्हणून एकमताने गावाच्या पुढाऱ्यांनी असा निर्णय घेतला की आम्रपालीला नगरवधू करण्यात येईल. या निर्णयानंतर आम्रपालीला महाल देण्यात आला. जो राजा कोणी येईल तो तिचा उपभोग करुन घेत असे. अशा या आम्रपालीच्या महालाजवळ एकदा एक भिक्षु भिक्षा मागायला आला. त्या भिक्षुची साधी राहणी, नम्र स्वभाव आणि चेहऱ्यावरचा शांत भाव यामुळे तिचं त्या भिक्षुकडे लक्ष गेलं.
आम्रपालीने स्वत:चे केस त्यागले
तिने त्याला महालात राहण्याची विनंती केली मात्र त्या भिक्षुने ती नाकारली. हा भिक्षु बुद्धांचा शिष्य होता. कालांतराने तिची भेट बुद्धांशी झाली. बुद्धांचं ज्ञान त्यांचे विचार यामुळे विलासी आयुष्य जगणाऱ्या आम्रपालीला नवं आयुष्य जगण्याची संधी मिळााली होती. आम्रपालीने गणिका म्हणून असलेलं आयुष्य मागे सारुन बुद्धांचे विचार आणि बौद्ध धम्म स्विकारला. एकेकाळच्या या सौंदर्यवतीने स्वत:चे केस त्यागले आणि भिख्खुणी म्हणून आयुष्य जगली तेही अगदी आनंदाने. समाजाने लादलेल्या बंधनातून मुक्त होत आम्रपालीने नवं आयुष्य स्विकारलं आणि बुद्धांची अनुयायी म्हणून धम्माचा प्रसार केला.