फोटो सौजन्य- istock
उद्यापासून ऑगस्ट महिन्याची सुरुवात होत आहे. यावेळी मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर 26 ऑगस्टपासून भाद्रपद महिना देखील सुरु होत आहे. त्यावेळी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. गणपती बाप्पाचे आपण कोणतेही व्रत करताना त्यामध्ये २१ दुर्वाचा समावेश केलेला असतो. २१ दुर्वांना वेगवेगळा अर्थ आहे. या दुर्वा अर्पण करणे हे अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली उपासना असल्याचे मानले जाते. हे फक्त एक पारंपरिक कर्मकांड नसून, यामागे गहन आध्यात्मिक अर्थ, सूक्ष्मदेह शुद्धीकरण, आणि मनशुद्धीचा एक वैज्ञानिक मार्ग देखील आहे. गणपती बाप्पाला २१ दुर्वा अर्पण करण्यामागे काय आहे आध्यात्मिक रहस्य, जाणून घेऊया
‘दुर्वा’या शब्दाचा अर्थ असा होतो की, “दु:खं व्रजति इति दुर्वा” – जे दुःख दूर करते ती दुर्वा. म्हणजेच ती तृण असूनही अनंत शक्तीची वाहक आहे. ती ज्या प्रकारे कितीही कापली तरी पुन्हा पुन्हा उगम पावते, ती अनंतचेतनेचं प्रतीक आहे — पुनर्जन्म, पुनरुत्थान, व अजेयता दर्शवते.
मान्यतेनुसार, दुर्वा ही पृथ्वी तत्वाचे प्रतीक मानले जाते. गणपतीसुद्धा मूलाधारचक्राचा अधिपती असल्यामुळे, दुर्वा आणि गणेश यांचा संबंध मूल प्रकृतीशी निगडित आहे. अशी देखील मान्यता आहे की, अनलासुर नावाचा राक्षस होता. त्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी आणि स्वर्ग दोन्हीमध्ये दहशत निर्माण केली होती. अनलासुराच्या दहशतीमुळे भयभीत झालेले ऋषी आणि देवसुद्धा भगवान शंकराकडे आले आणि त्यांनी आपली दुर्दशा सांगितली आणि अनलासुरपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली.
त्यावेळी महादेवांनी असे म्हटले होते की, अनलासुराचा वध फक्त श्री गणेशच करू शकतो. नंतर तेच झाले आणि श्री गणेशाने अनलासुरला गिळले. असे केल्याने श्री गणेशाच्या पोटात तीव्र जळजळ होऊ लागली. त्याच्या पोटातील जळजळ कमी करण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले. पण दिलासा मिळाला नाही. त्यानंतर ऋषी कश्यप यांनी दुर्वाच्या २१ गुंठ्या बनवून श्री गणेशाला खाऊ घातल्या आणि दुर्वा प्राशन करताच त्यांच्या पोटातील जळजळ कमी झाली. तेव्हापासून श्री गणेशाला दुर्वा प्रिय असल्याचे म्हटले जाते. तसेच गणपतीच्या पूजेमध्ये देखील नेहमी दुर्वांचा समावेश केला जातो.
1. एकाग्रता – मन एकवट करण्याची सुरुवात
2 द्वैत निवृत्ती – मी-ते, सुख-दुःख यापलीकडे जाणे
3 त्रिगुण शमन – सत्त्व, रज, तम यांवर संयम
4 चतुर्वेद पूजन – ज्ञानप्राप्तीची दिशा
5 पंचतत्त्व साक्षात्कार – पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचे संतुलन
6 षड्चक्र जागृती – मूलाधार ते आज्ञा चक्रापर्यंतची ऊर्जा प्रवाह निर्मिती
7 सप्तधातू शुद्धी – शरीरातील सात धातूंची निर्मळता
8 अष्टदिशा रक्षण – संपूर्ण जीवनात रक्षणभाव
9नवग्रह शांतता – ग्रहदोष निवारण
10 दशदिक्बंधन निर्मूलन – दहा दिशांमधील निगेटिव्ह ऊर्जा शमवणे
11 एकादश रुद्र तत्त्व प्रबोधन – रुद्रतेज जागवणे
12 द्वादश आदित्य तेज जागरण
13 त्रयोदशी – मृत्युतत्त्वावर विजय
14 चतुर्दशी – मनातील भयावर मात
15 पूर्णिमा – समृद्धी आणि शांतीची प्राप्ती
16 सोडस संस्कार जागृती – जीवनातील महत्त्वाचे संस्कार जागृत करणे
17 सप्तर्षि स्मरण – ऋषिमार्गाची स्मृती
18 अष्टसिद्धींची प्राप्ती
19 नवविधा भक्तीचा अभ्यास
20 विश्वरूप दर्शनाची पात्रता
21 पूर्ण आत्मसमर्पण – त्वमेव सर्वं भावसंपन्न पूर्ती
ज्यावेळी आपण २१ दुर्वा अर्पण करतो त्यावेळी जप, ध्यान किंवा मंत्रोच्चार करतो त्यामुळे व्यक्तीच्या ऊर्जा केंद्रांवर सकारात्मक प्रभाव पडतो. विशेषतः हे उपाय मूलाधार ते सहस्रार चक्र शुद्ध करतात.
ॐ गं गणपतये नमः दुर्वांकुरान् समर्पयामि।
दुर्वा अर्पण करताना या मंत्रांचा जप केल्याने ती जणू अंतर्यामाला वाहिलेली श्रद्धा ठरते. दुर्वा फक्त तृण नाही, ती भक्तीचा मूलतत्त्व मंत्र आहे. २१ दुर्वा म्हणजे २१ भावस्थिती, २१ शरीरातील केंद्रांची शुद्धी आणि २१ पायऱ्यांची आत्मोन्नती. ज्यावेळी श्रद्धा, मंत्र आणि ध्यान यांची त्रिसूत्री या 21 दुर्वांमध्ये एकत्र येते त्यावेळी साधकाला श्रीगणेशाचा ‘सिद्धिदाता’ रूपात साक्षात्कार होतो.
त्यासोबतच २१ दुर्वा म्हणजे ईश्वराला अर्पण केलेल्या २१ मौन प्रार्थना, असे म्हटले जाते आणि श्रीगणेश त्या सर्व प्रार्थनांचा एकाच प्रसादाने उत्तर देतो ते म्हणजे“विघ्न नाही, विजयी हो.”
(टीप – हा लेख ॲड. विकास एस. भाले (आध्यात्मिक लेखक व साधक) यांनी लिहिला असून आम्ही माहितीसाठी देत आहोत.)