
सूर्याचं देखील तेज फिकं पडेल असा तो तेजस्वी बालक होता. हत्तीच्या कानातून याचा जन्म झाला म्हणून जालिंदरनाथांनी या मुलाचं नाव कानिफनाथ असं ठेवलं. आणि या विश्वाच्या कल्याणासाठी म्हणून कानिफनाथ हिमालयातून मढीच्या दिशेने निघाले. कानिफनाथ महाराजांनी पहिल्यांदा जिथे वास्तव्य केलं ते आणि संजिवन समाधी घेतली ते ठिकाण म्हणजे मढी. असं म्हणतात की, मढी म्हणजे नाथसंप्रदायातील भक्तांसाठी साक्षात पंढरीच. अहिल्यानगरमधील हे मढी येथे कानिफनाथ महाराजांनी अनेक लीला आणि चमत्कार केले. तंत्र, मंत्र आणि योग विद्येचं माहेरघर मढीला म्हटलं जातं. कानिफनाथांचं हे मंदिर गड किल्यासारखं दिसतं या गडाला अध्यात्मिक बाजू आहे तशी ऐतिहासिक बाजू देखील आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी राणी येसूबाई आणि शंभूराजांचा मुलगा शाहूमहाराज यांना मोघलांनी याच परिसरांत काही काळ नजरकैदेत ठेवलं होतं. नाथसंप्रदायातील अनेक भक्त आवर्जून कानिफनाथांच्या दर्शनास मोठ्या भक्तीभावाने येतात.
असं म्हणतात की, जेव्हा अन्याय अत्याचार वाढू लागले तेव्हा नारायणांनी म्हणजेच भगवान विष्णू यांनी नवनाथांचा अवतार घेतला. लोकांना अध्यात्म आणि भक्तीमार्ग काय आहे ? काय चांगलं काय वाईट हे त्यांनी समजावून सांगितलं. आजंही कानिफनाथांच्या गुहेत गेल्यावर ओम असा ध्वनी ऐकू येतो, असं भाविक सांगतात. अहिल्यानगर जिल्ह्यात आजंही कानिफनाथांचे अनेक भक्त आहेत. खरंतर हा जिल्हाच कानिफनाथांच्या समाधीमुळे ओळखला जातो.