
national technology day 2026 india pokhran test anniversary marathi news
National Technology Day 2026 India : आज ११ मे! हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा आहे. भारताने जागतिक नकाशावर स्वतःची एक वेगळी आणि सामर्थ्यवान ओळख निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न केले, त्याचे प्रतीक म्हणजे ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ (National Technology Day). तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने घेतलेली गरुडझेप आणि आपल्या शास्त्रज्ञांनी दिलेले बलिदान तसेच कष्टाचे फळ म्हणून आज आपण एका प्रगत राष्ट्राकडे वाटचाल करत आहोत.
या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व ११ मे १९९८ शी जोडलेले आहे. याच दिवशी भारताने राजस्थानच्या पोखरण वाळवंटात ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत पाच यशस्वी अणुचाचण्या केल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने जगाला दाखवून दिले की, आपण केवळ शांतताप्रिय देश नाही, तर संरक्षणासाठी सक्षम असलेले अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत. या चाचण्यांमुळे अमेरिकेसारख्या महासत्तांनी भारतावर निर्बंध लादले, पण भारताने हार मानली नाही. याच विजयाची आठवण म्हणून १९९९ पासून ११ मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sindhu 2.0: ‘दुसरी संधी नक्की मिळेल!’ पंतप्रधान मोदींच्या एका इशाऱ्यानंतर ‘ही’ संरक्षण यंत्रणाच करणार पहिला वार
११ मे हा केवळ अणुचाचण्यांचा दिवस नाही, तर याच दिवशी भारताने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे पहिले विमान ‘हंसा-३’ चे बेंगळुरू येथे यशस्वी उड्डाण केले होते. तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) याच दिवशी ‘त्रिशूल’ या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. एकाच दिवशी घडलेल्या या तीन मोठ्या ऐतिहासिक घटनांनी भारताच्या तांत्रिक क्षमतेवर शिक्कामोर्तब केले.
आजच्या काळात तंत्रज्ञान हे केवळ युद्धापुरते मर्यादित राहिलेले नाही. कृषी, शिक्षण, आरोग्य आणि अवकाश विज्ञानात तंत्रज्ञानाने मोठी क्रांती घडवली आहे. देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि वैज्ञानिक संस्थांमध्ये आजच्या दिवशी विशेष प्रदर्शने, चर्चासत्रे आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश ‘नॅशनल टेक्नॉलॉजी कौन्सिल’च्या माध्यमातून तरुण पिढीला विज्ञानाकडे आकर्षित करणे आणि त्यांच्यातील नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देणे हा असतो. “आत्मनिर्भर भारत” बनवण्यासाठी आपल्याकडे दर्जेदार मानवी संसाधन असून, त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे ही काळाची गरज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global India:’ते सोबत रामायण अन् गीता घेऊन आले होते!’ PM कमला प्रसाद यांच्या भाषणाने भारतीय अंतर्मुख; नेल्सन बेटाचे होणार नामांतर
आज भारत आयटी (IT) क्षेत्रातील जागतिक केंद्र बनला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डेटा सायन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये आपण इस्रो (ISRO) सारख्या संस्थांच्या माध्यमातून चंद्रावर आणि मंगळावर पोहोचलो आहोत. भविष्यात हवामान बदल, ऊर्जा संकट आणि अन्न सुरक्षा यांसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपले शास्त्रज्ञ आणि अभियंते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. तंत्रज्ञानातील ही प्रगती केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी, हेच या दिवसाचे खरे उद्दिष्ट आहे.