India W Beat Bangladesh W in asian games
BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ४ विकेट्स गमावून १९५ धावा केल्या. सलामीवीर शफाली वर्माने ४९ चेंडूंमध्ये नाबाद १०० धावा केल्या, ज्यात ९ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे शफालीचे पहिले शतक होते. स्मृती मंधानाने १९ चेंडूंमध्ये ३७ धावा करत अत्यंत आक्रमक खेळी केली. तिने ५ चौकार आणि २ षटकार मारले. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३३ चेंडूंमध्ये ६ चौकारांच्या मदतीने ४० धावांचे योगदान दिले. ऋचा घोषला फक्त २ धावा करता आल्या. अखेरीस, भारती फूलमालीने ५ चेंडूंमध्ये नाबाद ९ धावा जोडल्या, ज्यामुळे भारतीय संघाला २० षटकांत ४ विकेट्स गमावून १९५ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. बांग्लादेशकडून रबिया खान, नाहिदा अख्तर, शंजिदा अख्तर मेघला आणि मरुफा अख्तर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशने सुरुवातीलाच विकेट गमावल्या. कोणत्याही फलंदाजाला जास्त वेळ क्रीजवर टिकता आला नाही. सलामीवीर दिलारा अख्तरने चार चौकार आणि एका षटकारासह २३ चेंडूंमध्ये २७ धावा करून सर्वाधिक धावा केल्या. शर्मिन अख्तरने १० धावा आणि सुलताना खातून १२ नाबाद धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्मा आणि नंदनी शर्मा यांनी प्रत्येकी तीन, तर श्री चरणीने दोन विकेट्स घेतले. क्रांती गौड आणि श्रेयंका पाटील यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतला.
भारतीय संघ आता मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भिडेल. सुवर्णपदकाचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. भारतीय महिला संघाचे सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय असेल . २०२२ च्या हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने श्रीलंकेला हरवून सुवर्णपदक जिंकले होते. यावेळी, पहिल्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला ८ विकेट्स राखून पराभूत केले. पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील कांस्यपदकाचा सामनाही २२ सप्टेंबर रोजीच खेळला जाईल.






