
Disha Salian, Mumbai High Court, Aaditya Thackeray
दिशा सालियन यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करून तपास करावा, अशी मागणी दिशा यांच्या वडिलांनी याचिकेत केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यापूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच आवश्यक असल्यास एफआयआर दाखल करून पुढील तपास करता येऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले होते.
“एका वडिलांनी आपली मुलगी गमावल्याने या प्रकरणाकडे आम्ही अत्यंत संवेदनशील दृष्टीने पाहत आहोत, राजकारण्यांवरील आरोपांपेक्षा एका वडिलांनी गमावलेल्या मुलीच्या मृत्यूचा तपास झालाच पाहिजे, अशी भूमिकाही न्यायालयाने व्यक्त केली होती.
दुसरीकडे आज झालेल्या सुनावणीत आदित्य ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद केला. ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित असून, राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून हे प्रकरण उभे करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यात माजी मंत्री नारायण राणे यांचे कुटुबीय आणि राष्ट्रीय माध्यातील एक वृत्त निवेदक (अर्णब गोस्वामी) या उल्लेख करण्यात आला होता. राजकीय वैरातून हे तथ्यहीन आरोप करण्यात आले असल्याने ही याचिका टिकण्यायोग्य नसल्याचे पासबोला यांनी म्हटले.
तर , दिशा सालियन यांच्या वडिलांबद्दल आपल्याला पूर्ण सहानुभूती असून, त्यांना त्यांच्या मुलीच्या मृत्यूबाबत समाधानकारक निष्कर्ष मिळायला हवा, अशी भूमिकाही आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी मांडली. पण या याचिकेतील मागण्या कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. “दिशाच्या वडिलांबद्दल आमची पूर्ण संवेदना आहे; मात्र त्यांच्या मुलीच्या मृत्यूवरून सुरू असलेले राजकारण थांबायला हवे,” अशी बाजू आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी मांडली.
Raigad News: महाडकरांना अखेर मोठा दिलासा! पाणीटंचाई दूर, नियमित पाणीपुरवठा पूर्ववत
दुसरीकडे, सरकारी वकील शिशिर हिरे यांनी याचिका फेटाळण्याची मागणी केली. दिशा सालियन यांच्या मृत्यूमध्ये गुन्हा झाल्याचे वैद्यकीय अहवालातून सिद्ध होत नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, दिशा सालियन यांच्या वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळले नसल्याचा दावाही सरकारी वकिलांनी केला. दिशा यांच्या मृत्यूबाबत विविध आरोप-प्रत्यारोप होत असल्याने तपास सुरू ठेवण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.
सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, दिशा सालियन ज्या व्यक्तीसोबत राहत होत्या, त्या रोहित रॉय यांचा जबाब नोंदवणयात आला होता. रोहित रॉय यांच्या जबाबानुसार, दिशा सालियन नैराश्यात होत्या आणि त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
तसेच, पोलिसांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन प्रकरणासंदर्भात कोणाकडे काही माहिती किंवा तक्रार असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतरही कोणीही अशा प्रकारची तक्रार घेऊन पुढे आले नसल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला.
दिशा सालियन यांच्या वडिलांनी केलेल्या मागण्यांवर, मुंबई पोलिसांच्या तपासावर आणि नव्याने एफआयआर दाखल करून तपास करण्याच्या मागणीवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवल्याने आता दिशा सालियन प्रकरणात नव्याने तपासाचे आदेश दिले जातात का, की याचिका फेटाळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.