Virat Kohli Test Retirement: Shock to Indian Sports World! After Rohit, Virat Kohli also bids farewell to Test Cricket..
virat kohli test retirement : भारतीय क्रीडा जगातला झटका देणारी बातमी समोर आली आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आता त्याच्या पाठोपाठ विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेने क्रिकेट जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय संघाला जूनमध्ये इंग्लंडचा दौऱ्यावर जायचे होते, त्याआधीच विराटने निवृत्ती जाहीर करून सर्वांना धक्का दिला आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर विराट देखील निवृत्ती जाहीर करेल असे बोलले जात होते. अखेर या माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे.
भारताचा दिग्गज विराट कोहली निवृत्त होताच त्याच्या १४ वर्षांच्या गौरवशाली कसोटी कारकिर्दीचा शेवट झाला आहे. या काळात त्याने १२३ कसोटी सामन्यांमध्ये ४६.८५ च्या सरासरीने ३० शतकांसह ९,२३० धावा केल्या आहेत. तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार देखील आहे, त्याने आर्मबँडच्या सहाय्याने ६८ पैकी ४० कसोटी सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे.
२०१६-२०१९ दरम्यान, विराट सर्वात लांब फॉरमॅटच्या इतिहासातील एक महान खेळाडू म्हणून दिसून आला होता. त्या कालावधीत त्याने ४३ कसोटी सामन्यांमध्ये ६६.७९ च्या सरासरीने ४,२०८ धावा केल्या, तसेच ६९ डावांमध्ये १६ शतके आणि १० अर्धशतकेही झळकावली. तथापि, २०२० चे दशक या सुपरस्टार फलंदाजासाठी फारसे ठीक राहिले नव्हते. त्याने ३९ कसोटी सामन्यांमध्ये ३०.७२ च्या सरासरीने केवळ २,०२८ धावाच केल्या होत्या. ज्यामध्ये ६९ डावांमध्ये त्याने केवळ तीन शतके आणि ९ अर्धशतके आहेत. यानंतर, जर आपण त्यांच्या आकडेवारीकडे बघितले तर २०२३ हे वर्ष त्यांच्यासाठी चांगले राहिले होते. या काळात त्याने ८ कसोटी सामन्यांमध्ये ५५.९१ च्या सरासरीने ६७१ धावा चोपल्या आहेत. ज्यामध्ये १२ डावांमध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता.
याआधी रोहित शर्माकडून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून इंग्लंड दौऱ्यासाठी नवीन कर्णधाराचा शोध सुरू करण्यात आला होता. त्याच्या निवृत्तींतर विराट देखील निवृत्ती घेईल असे बोलले जात होते. कसोटी कर्णधारपदासाठी एक मोठा पर्याय मानला जात असलेल्या जसप्रीत बुमराहनेही कामाच्या ताणामुळे इंग्लंडला जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, आता भारतीय क्रिकेट संघाला आता नवीन कर्णधाराकडे वाटचाल करावी लागणार आहे.