
गुजरात विरुद्ध सामना हरल्यानंतर राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक संगकारा पत्रकार परिषेजेत म्हणाले की, ‘माझ्या मते, एखादा खेळाडू मैदानात उतरेपर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णपणे सज्ज आहे की नाही हे सांगता येत नाही. पण या आयपीएलमध्ये जगातील काही सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध वैभवची कामगिरी पाहता, मी म्हणू शकतो की तो कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे. मला खात्री आहे की त्याला लवकरच भारतीय संघात स्थान मिळेल.’
संगकारा यांनी वैभवच्या फलंदाजीचे कौतुक केले ते पुढे म्हणाले, ‘या युवा फलंदाजाने संपूर्ण हंगामात उत्तम परिपक्वता दाखवली आणि संघासाठी सलामीच्या भागीदारीची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे सांभाळली. केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही राजस्थान रॉयल्सचा सपोर्ट स्टाफ वैभवला योग्य दिशेने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले, आमच्याकडे त्याच्यासाठी एक चांगली योजना आहे. आम्ही त्याच्या मनात अनावश्यक गोष्टी भरत नाही. तो आमच्या संघाच्या सर्व बैठकांना उपस्थित राहतो, आपले मत देतो आणि लक्षपूर्वक ऐकतो. तो खूप मेहनत करतो, गोलंदाजांचा अभ्यास करतो, त्यांचे व्हिडिओ पाहतो आणि सामन्यांपूर्वी कसून तयारी करतो. त्याने आपले मन शांत ठेवावे आणि त्याच निर्भयतेने फलंदाजी करावी, अशी आमची इच्छा आहे.’
१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने IPL 2026 मध्ये दमदार प्रदर्शन करत क्रिकेटविश्वाला थक्क केले. राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना त्याने २३७ च्या स्ट्राइक रेटने १६ सामन्यांत ७७६ धावा केल्या. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे राजस्थान संघ क्वालिफायर-2 पर्यंत पोहोचला. तो सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. परंतु, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना अंतिम सामन्यात त्याला मागे टाकण्याची एक संधी मिळेल. शुक्रवारी झालेल्या क्वालिफायर-2 सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध वैभवने ४७ चेंडूत ९६ धावांची विस्फोटक खेळी केली. यामध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. या सामन्यात राजस्थानला जरी पराभव स्वीकारावा लागला, तरी वैभवच्या खेळीने सर्वांची मने जिंकली. मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी दाखवलेल्या विश्वासानंतर आगामी भारताच्या टी-20 मालिकांसाठी वैभव सूर्यवंशीच्या नावाची चर्चा जोरात सुरू झाली आहे.