
भारत बनणार टेक लीडर? पंतप्रधान Narendra Modi च्या भाषणाने वाढली उत्सुकता! म्हणाले, तंत्रज्ञान माणसांसाठी, त्यांची जागा...
भारत येत्या काळात जगातील पहिल्या तीन एआय महासत्तांमध्ये असावा, ते देखील केवळ वापराच्या बाबतीत नाही तर निर्मितीतही, हा माझा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय आणि भारत याबाबत आपली मते व्यक्त केली आहेत. आमचे आयटी क्षेत्र फक्त सेवा देण्यातच नव्हे तर भारत आणि जगासाठी उपयुक्त एआय उत्पादने तयार करण्यात आघाडीवर असावे, अशी आमची इच्छा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एआयमधील आत्मनिर्भर भारत तयार करायचा असेल तर डिजिटल शतकासाठी भारताने स्वतःचा कोड लिहिला पाहिजे. इंडिया एआय मिशनद्वारे आम्ही असा कोड तयार करत आहोत जो आपल्या मूल्यांचे प्रतिबिंब असेल, आपल्या लोकांची सेवा करेल आणि भारताला जबाबदार एआय नेतृत्वाच्या भूमिकेत उभे करेल. आमची दृष्टी स्पष्ट आहे, एआयने जागतिक विकासाला गती द्यावी आणि तो मानवकेंद्री राहावा. जगात एआयमुळे दरी वाढण्याची चिंता असताना, भारत एआयचा वापर दरी मिटवण्यासाठी करत आहे. आत्मनिर्भर भारतातील एआयसाठी माझी दृष्टी तीन स्तंभांवर आधारित आहे. ते म्हणजे, सार्वभौमत्व, सर्वसमावेशकता आणि नवोन्मेष. एआय मधील आत्मनिर्भर भारत म्हणजे डिजिटल शतकासाठी भारताने स्वतःचा कोड लिहिणे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मी एआयला एक ‘फोर्स-मल्टिप्लायर’ मानतो, जो आपल्या शक्यतांच्या मर्यादा आणखी पुढे नेण्यास मदत करेल. भारतीय एआय स्टार्टअप्सचे मूल्य शेकडो अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल आणि लाखो उच्च-गुणवत्तेच्या नोकऱ्या निर्माण होतील. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भारताकडे एआय महासत्ता बनण्याची प्रतिभा आणि उद्यमशील ऊर्जा तर आहेच ती देखील केवळ ग्राहक म्हणून नव्हे तर निर्माता म्हणून. एआयला नवोन्मेष आणि सर्वसमावेशकतेचा ‘फोर्स-मल्टिप्लायर बनवण्यासाठी आमच्या प्रतिभावान युवकांच्या प्रत्येक प्रयत्नाला आम्ही बळकट करण्यास कटिबद्ध आहोत. – एआय संदर्भात जगाने समान तत्वे आणि मानके तयार करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे.