
hamas sniper commander omar ahbu qasim killed gaza idf airstrike civilian death toll
पश्चिम आशियातील युद्धाचा भडका शांत होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून गाझा पट्टीत परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालली आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झालेल्या या रक्तरंजित युद्धाला आता अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. संपूर्ण गाझा शहर सध्या ढिगाऱ्याखाली आणि राखेत बदलले आहे. अशातच, इस्रायली संरक्षण दलाने (IDF) गाझामध्ये (Gaza) एक मोठी लष्करी कारवाई करत हमासचा अत्यंत घातक स्नायपर बटालियन कमांडर ‘ओमर अहमद अबू कासिम’ याला एका भीषण हवाई हल्ल्यात ठार केल्याचा दावा केला आहे. या कारवाईमुळे गाझामधील तणाव कमालीचा वाढला असून हमासच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
इस्रायली लष्कराच्या अधिकृत निवेदनानुसार, अबू कासिम हा हमासच्या लष्करी शाखेतील स्नायपर युनिटचा प्रमुख होता. युद्धादरम्यान गाझामधील विविध भागात तैनात असलेल्या इस्रायली सैनिकांवर झालेल्या अनेक जीवघेण्या स्नायपर हल्ल्यांमागे त्याचा थेट हात होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये लागू झालेल्या तात्पुरत्या युद्धविराम कराराच्या काळातही तो छुप्या पद्धतीने इस्रायली सैनिकांवर नव्या हल्ल्यांचे नियोजन करत होता. इस्रायली सैन्याने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या दक्षिण कमांडच्या अंतर्गत तैनात असलेले सैनिक सुरक्षेसाठी आणि कोणत्याही तात्काळ धोक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी गाझामध्ये उपस्थित आहेत आणि अशा धोक्यांना ते तात्काळ नष्ट करत राहतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-UkraineWar: 2,000 किमी लांब पळाले रशियन आरमार; नौदलाची समुद्रातून मानहानीकारक पळापळ, युक्रेनसमोर महासत्तेची मोठी घसरण
इस्रायली लष्कराने केवळ मध्य गाझामध्येच नव्हे, तर उत्तर गाझामध्येही आपल्या कारवाया अत्यंत तीव्र केल्या आहेत. मंगळवारी आयडीएफने केलेल्या एका अचूक आणि गुप्तचर माहितीवर आधारित हवाई हल्ल्यात हमासच्या कुप्रसिद्ध ‘नुख्बा’ (Nukhba) विशेष दलाच्या दोन प्रमुख कमांडरांचा खात्मा केला. यामध्ये नुख्बा कंपनीचा उपकमांडर ‘अली शमलख’ हा मारला गेला. शमलख याच्यावर इस्रायली नागरिकांना आणि सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी नवीन दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे आणि गाझामध्ये दहशतवादी जाळे मजबूत करण्याचा गंभीर आरोप होता.
याच मोहिमेदरम्यान हमासच्या साबरा बटालियनमधील नुख्बा गटाचा प्रमुख ‘नासेर लोह’ हादेखील मारला गेल्याचे इस्रायली लष्कराने जाहीर केले आहे. आयडीएफच्या दाव्यानुसार, गाझा पट्टीत तैनात असलेल्या इस्रायली सैनिकांच्या हालचालींवर पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ल्याची तयारी करत असतानाच या दोन्ही कमांडरांना अचूक टार्गेट करून हवेतच उडवण्यात आले. या लागोपाठच्या धक्क्यांमुळे हमासच्या अंतर्गत संवाद यंत्रणेला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे हमासच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असताना, दुसरीकडे गाझामधील सर्वसामान्य पॅलेस्टिनी नागरिकांचे मरण सुरूच आहे. गेल्या २४ तासांत गाझा पट्टीत झालेल्या वेगवेगळ्या इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये निष्पाप मुले, महिला, स्थानिक पोलीस अधिकारी आणि मानवतावादी अन्न-धान्याची मदत मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेले नागरिक मिळून किमान १६ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. हे हल्ले उत्तर, मध्य आणि दक्षिण गाझामधील दाटीवाटीच्या निवासी क्षेत्रांवर, पोलीस चौक्यांवर आणि विस्थापित नागरिकांच्या छावण्यांवर करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये अनेक घरे जमीनदोस्त झाली असून शेकडो नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
पॅलेस्टिनी मानवाधिकार संघटनांनी इस्रायलवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, इस्रायली लष्कर कोणत्याही कराराचे आणि युद्धविरामाचे पालन करत नसून जाणूनबुजून सर्वसामान्य नागरिकांच्या वस्त्यांना आणि विस्थापितांच्या छावण्यांना लक्ष्य करत आहे. गाझा पट्टीतील अन्न आणि पाण्याचा तुटवडा असताना अशा हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिकच अमानुष बनली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PoK Protest: PoK मध्ये बंड! बलुचिस्तानमध्ये मृत्यूचे थैमान, भारताच्या अणु-पाणबुड्या सज्ज; अल्ताफ हुसेन यांनी पाक सैन्याला ललकारले
गाझा आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आणि अत्यंत वेदनादायी आकडेवारीनुसार, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी कागदोपत्री युद्धविराम लागू झाल्यापासून आजतागायत गाझामध्ये १,१२३ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ३,५९९ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झालेल्या या महाभयानक लष्करी मोहिमेपासून आतापर्यंत गाझामध्ये तब्बल ७३,२४७ पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत, तर जखमींचा आकडा १,७३,७०७ च्या वर गेला आहे. या मृतांमध्ये जवळपास ७०% प्रमाण हे निष्पाप महिला आणि बालकांचे आहे. याशिवाय हजारो लोक अद्यापही उद्ध्वस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून, बचाव पथकांकडे पुरेशी उपकरणे आणि इंधन नसल्यामुळे त्यांना बाहेर काढणे अशक्य झाले आहे. या युद्धाने आधुनिक मानवी इतिहासातील सर्वात भीषण मानवतावादी संकट निर्माण केले आहे.