Operation Sindoor : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर (PoK) व पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मुझफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरच्या अहमद पूर्व भागातील हवाई कारवायांची पाकिस्तानने अधिकृतपणे पुष्टी केली असून, यासंदर्भात भारताने देखील ‘सर्जिकल आणि लक्ष्यित हल्ल्यां’ची कबुली दिली आहे.
भारतीय सैन्याने पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत बुधवारी पहाटे हे हल्ले केले. या हल्ल्यात २५ भारतीय नागरिक आणि एक नेपाळी नागरिक ठार झाला होता. याच घटनेनंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत नऊ दहशतवादी छावण्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.
शेहबाज शरीफ यांची तीव्र प्रतिक्रिया: “शत्रूच्या घृणास्पद कृत्याचे प्रत्युत्तर देऊ”
भारताच्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “विश्वासघातकी शत्रूने पाकिस्तानमधील पाच ठिकाणी भ्याड हल्ला केला आहे. आक्रमकतेचे हे घृणास्पद कृत्य शिक्षा भोगल्याशिवाय राहणार नाही. आमचे सशस्त्र दल पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत आहेत.” शरीफ यांनी पुढे म्हटले की, “संपूर्ण राष्ट्र आपल्या सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आमचा दृढनिश्चय आणि मनोबल अढळ आहे. शत्रूच्या कोणत्याही कुरापतींना यश येऊ दिले जाणार नाही.”
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sindoor: जय हिंद! भारताने घेतला पहलगामचा बदला; पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर Air Strike
DG ISPR आणि संरक्षण मंत्रालयाचे स्पष्टीकरण
पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (DG ISPR) च्या माहितीनुसार, बहावलपूरच्या अहमद पूर्व भागातील सुभानुल्लाह मशिदीवर, तसेच कोटली आणि मुझफ्फराबादमध्ये भारताने तीन हवाई हल्ले केले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी वायूदलाने देखील प्रत्युत्तर दिले असून, “पाकिस्तान याला स्वतःच्या वेळेनुसार आणि जागेनुसार प्रत्युत्तर देईल,” असे ते म्हणाले. भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, हल्ल्यांचा उद्देश फक्त दहशतवादी तळांवर होता, कोणत्याही पाक लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आलेले नाही. या कारवाईत हवाईशक्तीचे नियोजनबद्ध आणि मोजमापाने वापर करण्यात आला.
हवाई हल्ल्यांमुळे जम्मू-कश्मीरमध्ये अलर्ट; विमान सेवा विस्कळीत
या कारवाईनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे हवाई वाहतुकीवर प्रत्यक्ष परिणाम झालेला असून, श्रीनगर, जम्मू, चंदीगड, अमृतसर, लेह आणि धर्मशाळा येथील विमान सेवा विस्कळीत झाली आहे. इंडिगो एअरलाइन्सने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत प्रवाशांना त्यांच्या प्रवासाआधी उड्डाण स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, स्पाइसजेट आणि अन्य विमान कंपन्यांनी देखील काही विमानतळ बंद असल्याचे जाहीर केले आहे.
#6ETravelAdvisory: Due to changing airspace conditions in the region, our flights to and from #Srinagar, #Jammu, #Amritsar, #Leh, #Chandigarh and #Dharamshala are impacted. We request you to check your flight status at https://t.co/CjwsVzFov0 before reaching the airport.
— IndiGo (@IndiGo6E) May 6, 2025
credit : social media
सैनिकांप्रती एकजूट आणि कठोर कारवाईचे संकेत
भारताच्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानने जाहीर केले आहे की, त्यांच्याकडे प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते सशस्त्र दलाच्या निर्णयावर विश्वास ठेवतात. भारताने याचे उत्तर देताना स्पष्ट केले की, हे आक्रमण नव्हे, तर सीमित आणि धोरणात्मक कारवाई आहे, जी नागरिकांच्या आणि जवानांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आवश्यक होती.
‘ऑपरेशन सिंदूर’
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत-पाक संबंधांमध्ये नव्याने तणाव निर्माण झाला आहे. भारताने पहलगाममधील हल्ल्याचा तितक्याच तीव्रतेने आणि अचूकतेने बदला घेतल्याचा संदेश दिला आहे. पाकिस्तानच्या भूमिकेत कठोरपणा दिसत असून, दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. जम्मू-कश्मीरसह उत्तर भारतातील नागरिकांना याचे थेट परिणाम भोगावे लागत असून, हवाई वाहतूक ठप्प होण्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असून, सरकार आणि सैन्याच्या पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.