पाण्यासाठी हाहाकार...! अल निनोमुळे १.१५ लाखांहून अधिक नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी संकटात
श्रीलंकेतील २५ प्रशासकीय जिल्ह्यांपैकी सात जिल्ह्यांतील नागरिक अल निनोशी संबंधित हवामान परिस्थितीमुळे प्रभावित झाले आहेत. दीर्घकाळ पुरेसा पाऊस न पडणे आणि वाढलेले तापमान यामुळे अनेक भागांतील नैसर्गिक जलस्रोत आणि जलाशयांतील पाणीसाठा कमी झाला आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अल निनोची स्थिती विकसित होत असून त्यामुळे आगामी काळातील हवामान पद्धतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
उत्तर-मध्य भागातील अनुराधापुरा जिल्ह्यातील सुमारे ३,५०० एकर-फूट क्षमतेच्या एरुवेवा जलाशयातील पाणीसाठा सुमारे १,००० एकर-फूटपर्यंत खाली आल्याचे सिंचन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मटाले आणि नंदिकदलसह अन्य भागांतील जलस्रोतांच्या पातळीतही घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत सिंचनासाठी आवश्यक पाण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे.
दुष्काळाचा परिणाम जलचरांवरही होत असल्याचे समोर आले आहे. ईशान्य श्रीलंकेतील मुल्लैथिवु भागातील तलावात हजारो लहान मासे मृतावस्थेत आढळल्याचे सांगण्यात आले आहे. खारे आणि गोडे पाणी मिसळल्याने ही घटना घडली असावी, असा अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. नैसर्गिक जलस्रोत आटत असल्यामुळे वन्यजीवांनाही पाण्याच्या शोधात दुसऱ्या भागांत जावे लागत असल्याचे चित्र आहे.
श्रीलंकेच्या कृषी क्षेत्रालाही पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे. धान, नारळ, केळी आणि पेरू यांसारख्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक भागांत पारंपरिक सिंचन स्रोतांतील पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सप्टेंबरच्या अखेरीपासून काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अपेक्षेप्रमाणे पाऊस झाल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि शेतीवरील संकट काही प्रमाणात कमी होऊ शकते. तोपर्यंत प्रभावित भागांत पाणीपुरवठा आणि इतर मदतकार्यांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.
Eiffel Tower Controversy : अन् पॅरिस पेटलं ;आयफेल टॉवरवर ‘लेडीज फर्स्ट’चा वाद






