
जागतिक पटलावर सध्याची स्थिती उद्योगांसाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायांसाठी थोडी जिकिरीची आहे म्हणायला हरकत नाही. आखाती देशांच्या मध्ये आणि संपूर्ण जगाच्या वेगवेगळ्या भागात चाललेल्या तणावपूर्वक संबंधामुळे, युद्धांमुळे व्यवसायांवर उद्योगांवर बऱ्याच प्रकारची बंधने आणि अडचणी लादल्या गेल्या आहेत. भारताचा ऑटोमोबाईल उद्योगही यासाठी अपवाद नाही. विशेषतः कच्च्या तेलांच्या किंमती, वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्या भागांची वाहतूक आणि एकंदरीत जागतिक पुरवठा साखळी ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो यावर याचा थेट परिणाम होत आहे.
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे 85 टक्के तेल आयात करतो. यातील मोठा हिस्सा मध्यपूर्वेतील म्हणजे आखाती देशांकडून येतो. अलीकडील देशांतर्गत असणाऱ्या तणावामुळे होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) या परिसरातील जहाजवाहतुकीवर दबाव निर्माण झाला होता. परिणामी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 95 ते 100 डॉलरच्या जवळ पोहोचल्या आहेत.
Trump on Hormuz : ‘आम्हाला कुणाची गरज नाही’ , Hormuz वरुन ट्रम्प …
इंधनाच्या वाढत्या किंमतींचा थेट परिणाम वाहनांच्या वापरावर आणि विक्रीवर होतो. पेट्रोल व डिझेल महाग झाल्यास ग्राहक नवीन वाहन खरेदीचे निर्णय पुढे ढकलतात. विशेषतः एसयूव्ही, व्यावसायिक वाहने आणि मोठ्या इंजिनांच्या वाहनांच्या विक्रीवर याचा परिणाम होतो.
वाहन उद्योगासाठी आणखी एक मोठे आव्हान म्हणजे सुट्या भागांची वाहतूक. भारतातील अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रॉनिक चिप्स, सेन्सर्स, वायरिंग हार्नेस आणि इतर महत्त्वाचे घटक आशिया, युरोप व मध्यपूर्व देशांच्या मार्गांद्वारे आयात करतात. लाल समुद्र आणि मध्यपूर्वेतील समुद्री मार्गांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे मालवाहतूक खर्च आणि वेळ दोन्ही वाढले आहेत. यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याशिवाय, जागतिक पुरवठा साखळीतील अनिश्चिततेमुळे वाहन उत्पादकांना अतिरिक्त साठा ठेवावा लागत आहे. यामुळे कार्यकारी खर्च वाढतो. अनेक कंपन्या आता पर्यायी पुरवठादार शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय रिफायनरी कंपन्यांनाही विविध प्रकारचे कच्चे तेल वापरण्यासाठी त्यांच्या प्रक्रियांमध्ये बदल करावे लागत आहेत, जे इंधन बाजारातील अस्थिरतेचे संकेत आहेत.
Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो …
वाहतूक क्षेत्रावरही या परिस्थितीचा परिणाम स्पष्ट दिसत आहे. इंधन महागल्यामुळे ट्रक, बस आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांचे ऑपरेटिंग खर्च वाढतात. परिणामी वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आणि तयार वाहनांची वाहतूक अधिक महाग होते. जागतिक स्तरावर वाढलेल्या ऊर्जा खर्चामुळे अनेक उद्योगांवर दबाव निर्माण झाला असल्याचे विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनी नमूद केले आहे.
एकूणच, आखाती देशांती आणि जगात चाललेल्या युद्धाचा भारतीय ऑटोमोबाईल उद्योगावर बहुअंगी परिणाम होत आहे. इंधन दरवाढ, सुटे ऑटो पार्टस पुरवठ्यातील अडथळे, वाढलेले वाहतूक खर्च आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे उद्योगासमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत.