मुंबईचे वर्चस्व संपणार? ‘या’ शहरात उभारली जाणारी देशातील सर्वात उंच इमारत, काय आहे सरकारचा मास्टरप्लॅन?
भारतात लवकरच एक नवीन विक्रम प्रस्थापित होणार आहे. देशातील सर्वात उंच इमारतीचा मान आतापर्यंत मुंबईतील एका इमारतीकडे होता आता तो मान मुंबईऐवजी दुसऱ्या शहराला मिळणार आहे. हा विक्रम लवकरच गुरुग्रामकडे जाऊ शकतो. हरियाणा सरकारच्या 'ग्लोबल सिटी' प्रकल्पांतर्गत, गुरुग्राममध्ये एक गगनचुंबी इमारत उभारण्याची योजना आखली जात आहे.
Tallest Skyscraper: भारतात लवकरच एक नवीन विक्रम प्रस्थापित होणार आहे. देशातील सर्वात उंच इमारतीचा मान आतापर्यंत मुंबईतील एका इमारतीकडे होता आता तो मान मुंबईऐवजी दुसऱ्या शहराला मिळणार आहे. हा विक्रम लवकरच गुरुग्रामकडे जाऊ शकतो. हरियाणा सरकारच्या ‘ग्लोबल सिटी’ प्रकल्पांतर्गत, गुरुग्राममध्ये एक गगनचुंबी इमारत उभारण्याची योजना आखली जात आहे, जी भारतातील सर्वात उंच इमारत ठरणार आहे. नेमका काय आहे प्रोजेक्ट? समजून घेऊयात.
हरियाणा सरकार गुरुग्राममध्ये ‘ग्लोबल सिटी’ नावाने एक विशाल आणि आधुनिक शहर विकसित करत आहे. द्वारका एक्सप्रेसवेच्या जवळ सुमारे १,००० एकर क्षेत्रावर हा प्रकल्प साकारला जात आहे. गुरुग्रामला प्रमुख आंतरराष्ट्रीय केंद्रांच्या तोडीस तोड अशा जागतिक व्यावसायिक केंद्रामध्ये रूपांतरित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या योजनेचाच एक भाग म्हणून, अत्यंत उंच इमारत उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे; ही इमारत उंचीच्या बाबतीत भारतातील सध्याचा विक्रम सहजपणे मागे टाकेल अशी अपेक्षा आहे.
किती उंच असेल ही इमारत?
अहवालांनुसार, प्रस्तावित टॉवरची उंची ६२० ते ७०० मीटरच्या दरम्यान असू शकते. सध्या भारतातील सर्वात उंच इमारत मुंबईतील ‘पॅलेस रॉयल’ ही आहे, जिची उंची सुमारे ३२० मीटर आहे. परिणामी, गुरुग्राममधील हा टॉवर विद्यमान विक्रमाला मागे टाकून दुप्पट उंचीचा ठरू शकतो. ही केवळ एक उंच इमारत नसेल; तर यात कार्यालये, हॉटेल्स, शॉपिंग स्पेस, कॉन्फरन्स सेंटर आणि विविध आधुनिक सुविधा असणार आहे. थोडक्यात, ही इमारत स्वतःच एक परिपूर्ण व्यावसायिक केंद्र म्हणून उभं राहणार आहे. सरकारला विश्वास आहे की, यामुळे गुरुग्रामकडे मोठ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आकर्षित होतील आणि गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
गुरुग्रामला काय होणार फायदा ?
हा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळू शकेल. बांधकामाच्या टप्प्यापासून ते त्यानंतरच्या व्यावसायिक कामकाजापर्यंत अनेक नवीन संधी निर्माण होतील. शिवाय, गुरुग्रामची ओळख केवळ आयटी आणि कॉर्पोरेट हबपुरती मर्यादित न राहता, एक जागतिक व्यावसायिक केंद्र म्हणूनही निर्माण होईल. या विकासामुळे रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
कधी होणार हा प्रकल्प सुरु ?
सध्या हा प्रकल्प प्राथमिक टप्प्यावर आहे. डिझाइन, मंजुरी आणि विकासकाची निवड यांसारख्या प्रक्रिया अद्याप पूर्ण व्हायच्या आहेत; त्यामुळे या इमारतीच्या बांधकामास अनेक वर्षे लागू शकतात. जर ही योजना यशस्वी झाली, तर गुरुग्राम भारताच्या नकाशावर आपली एक नवी ओळख निर्माण करू शकेल. देशातील ही सर्वात उंच इमारत केवळ एका विक्रमाचे प्रतीक नसेल, तर आधुनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांच्या दिशेने होणाऱ्या भारताच्या जलद प्रगतीचे ते निदर्शक ठरेल. आगामी काळात गुरुग्रामचे स्वरूप पूर्णपणे बदलू शकते.