
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
महाराष्ट्राचे मा. राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते आज सार्थक एज्युकेशनल ट्रस्टच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त आणि नॅशनल अबिलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया (NAAI) यांच्या सहकार्याने आयोजित इंटरनॅशनल अबिलिम्पिक्स फिनलंड २०२७ पूर्व-मूल्यांकन (Pre-International Assessments) कार्यक्रमाचे उद्घाटन वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे झाले. यावेळी ११ व्या इंटरनॅशनल अबिलिम्पिक्स – फिनलंड २०२७ साठी भारताच्या तयारीला अधिकृत सुरुवात करण्यात आली. दिव्यांगजनांसाठी होणाऱ्या जागतिक वर्क स्किल ऑलिम्पिक्स स्पर्धेत भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक पाठवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
दिव्यांग सक्षमीकरण विभाग (DEPwD), टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट (TPCDT), होंडा इंडिया फाउंडेशन, (Pay Autention) आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात धोरणकर्ते, उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी, शैक्षणिक संस्था, CSR प्रमुख आणि दिव्यांग सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. दिव्यांगजनांसाठी कौशल्य विकास, रोजगार आणि सर्वसमावेशक समाज उभारण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मा. राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा म्हणाले, “देशाच्या जनगणनेनुसार भारतात २.६८ कोटी दिव्यांग आहेत. मात्र प्रत्यक्ष संख्या यापेक्षा अधिक असू शकते. महाराष्ट्रात जवळपास ३० लाख दिव्यांग आहेत. त्यामुळे त्यांना समान संधी देणे ही आपली जबाबदारी आहे. शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या क्षेत्रात सार्थक एज्युकेशनल ट्रस्टने केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय अबिलिम्पिक्समधील सर्व विजेत्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. विकसित भारत घडवण्यासाठी प्रत्येक दिव्यांगजनांला त्यांची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली पाहिजे. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा वापर न्याय, संवेदनशीलता आणि दूरदृष्टी ठेवून केला तरच सर्वसमावेशक भारत घडेल.”
१० व्या इंटरनॅशनल अबिलिम्पिक्स, मेट्झ (फ्रान्स) येथे भारताने १ सुवर्ण, २ रौप्य, ३ कांस्य पदके आणि एक उत्कृष्टता प्रमाणपत्र मिळवत सर्वोत्तम कामगिरी केली होती. या यशानंतर NAAI ने फिनलंड २०२७ साठी भारताचे सर्वात मजबूत पथक तयार करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी स्पर्धकांना माहिती तंत्रज्ञान, हॉस्पिटॅलिटी, सर्जनशील कला, हस्तकला आणि सेवा क्षेत्रांसह २८ आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त कौशल्यांमध्ये प्रशिक्षण आणि मूल्यांकन दिले जात आहे.
कार्यक्रमातील नॅशनल अबिलिम्पिक्स स्किल प्रदर्शन हे प्रमुख आकर्षण ठरले. यामध्ये ३० राष्ट्रीय अबिलिम्पिक्स विजेत्यांनी फोटोग्राफी, बेकरी, हॉस्पिटॅलिटी, टेलरिंग, डिझाइन, चित्रकला, डिजिटल तंत्रज्ञान आणि इतर व्यावसायिक कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रदर्शनातून कौशल्याच्या बळावर सन्मानाने रोजगार मिळवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसे होता येते, हे दाखवून देण्यात आले.
कार्यक्रमात धोरण, भागीदारी, समावेशक रोजगार, तंत्रज्ञान, माध्यमे आणि भविष्यातील नेतृत्व या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ॲमेझॉन, टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट, ड्यूश बँक, महिंद्रा आणि महिंद्रा,युनियन बँक ऑफ इंडिया, स्टारटेक, सदरलँड ग्लोबल, आयआयटी बॉम्बे साइन, वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई आणि इतर आघाडीच्या संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. याचबरोबर, टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने आपल्या (Pay Autention) या उपक्रमाअंतर्गत १५ न्यूरोडायव्हर्स (Neurodiverse) व्यक्तींना चित्रकला, नृत्य, बेकरी आणि इतर विविध कौशल्यांचे सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या कलागुणांना आणि कौशल्यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या चर्चांमध्ये भविष्यातील रोजगार (Future of Work) हा मुख्य विषय होता. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे उद्योगांमध्ये मोठे बदल होत आहेत. मात्र रोजगार कमी होणे हा मुख्य प्रश्न नसून, बदलत्या गरजांनुसार सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करणे ही खरी गरज असल्याचे वक्त्यांनी सांगितले. दिव्यांगांना भविष्यातील रोजगारासाठी सक्षम करण्यासाठी सरकार, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी अधिक मजबूत सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चर्चेदरम्यान दिव्यांगांची अचूक जनगणना, जनगणना अधिकाऱ्यांचे योग्य प्रशिक्षण आणि अधिक सुलभ प्रशासन यांची गरजही अधोरेखित करण्यात आली. यामुळे अधिक प्रभावी धोरणे तयार होतील आणि दिव्यांगांचा देशाच्या विकासात अधिक सहभाग वाढेल, असे मत व्यक्त करण्यात आले.
होंडा इंडिया फाउंडेशनचे CSR प्रमुख राजीव तनेजा म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत भारतात दिव्यांग सक्षमीकरणाच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. २०१६ च्या ‘दिव्यांग हक्क कायद्या’नंतर उद्योगक्षेत्राचा सहभाग आणि समाजातील जागरूकता वाढली आहे. आता दिव्यांगांना भविष्यातील रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये देणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ (EV Technician) आणि सौर ऊर्जा तंत्रज्ञ (Solar Technician) हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अधिकाधिक संस्थांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.”
सार्थक एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नॅशनल अबिलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र अग्रवाल म्हणाले, “फिनलंड २०२७ साठी भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक पाठवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, उद्योगक्षेत्राचे सहकार्य आणि मजबूत सहाय्य व्यवस्था यांच्या माध्यमातून आम्ही दिव्यांगांना जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी तयार करत आहोत. सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे अधिक समावेशक भारत घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
गेल्या १८ वर्षांत सार्थक एज्युकेशनल ट्रस्टने जनजागृती आणि विविध उपक्रमांद्वारे ५३ लाखांहून अधिक दिव्यांगांवर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. तसेच १ लाखांहून अधिक दिव्यांगांना शिक्षण, पुनर्वसन, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी थेट मदत केली आहे. संस्थेने २०० हून अधिक जनजागृती उपक्रम, ५,००० हून अधिक कॉर्पोरेट भागीदारांचे नेटवर्क, १,१०० हून अधिक स्वयंसेवी संस्थांसह इंडिया डिसॅबिलिटी एम्पॉवरमेंट अलायन्स (IDEA) आणि १ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना जोडणारे तीन डिजिटल प्लॅटफॉर्म उभारले आहेत.
सार्थक एज्युकेशनल ट्रस्टच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम भारताच्या ‘इंटरनॅशनल अबिलिम्पिक्स फिनलंड २०२७’च्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. सरकार, उद्योगक्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून प्रत्येक दिव्यांगाला शिकण्याची, स्पर्धा करण्याची, रोजगार मिळवण्याची आणि प्रगती करण्याची समान संधी मिळावी, तसेच ‘विकसित भारत’ घडवण्याच्या संकल्पाला अधिक बळ मिळावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य संदेश होता.