
९व्या राष्ट्रीय पोषण माहनिमित्त 'नंद घर'ची मोठी मोहीम
महिनाभर चालणारे हे राष्ट्रीय अभियान पोषणाचा विषय समुदायांपर्यंत पोहोचविण्याची तसेच कुटुंबे, संस्था आणि नागरिकांना पोषण ही सामूहिक जबाबदारी म्हणून स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्याची सरकारची बांधिलकी दर्शवते. याच दृष्टिकोनाला तळागाळात पुढे नेत, ‘नंद घर का मिशन, संपूर्ण पोषण’ हे अभियान १८ राज्यांमधील १५,००० हून अधिक नंद घरांमधील मुले, माता, वडील, नंद घर दीदी (अंगणवाडी कार्यकर्त्या) आणि समुदायांना जोडणार आहे. यामधून हा संदेश दिला जाईल की, खरी पोषण सुरक्षा केवळ पोटभर जेवणापुरती मर्यादित नसून प्रत्येक मुलाभोवती आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याशी संबंधित आहे.
नंद घर आधुनिक आणि तंत्रज्ञान-सक्षम केंद्रांच्या माध्यमातून भारतातील अंगणवाडी व्यवस्थेला अधिक सक्षम बनवत आहे. या केंद्रांमध्ये पोषण, प्रारंभिक बालसंगोपन व शिक्षण, प्राथमिक आरोग्यसेवा आणि महिला सक्षमीकरण या सेवा एकाच व्यासपीठावर एकत्रित करण्यात आल्या आहेत. हा सर्वसमावेशक दृष्टिकोन या बाबीची जाणीव करून देतो की, मुलाचे कल्याण केवळ त्याच्या आहारावर अवलंबून नसते, तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मिळणारे ज्ञान, काळजी आणि सहकार्य यांचाही त्यावर परिणाम होतो.
या समुदाय-केंद्रित दृष्टिकोनाचे एक प्रमुख उदाहरण म्हणजे नंद घरचा ‘मदर्स फूड प्रिपरेशन प्रोग्राम’. या कार्यक्रमांतर्गत मातांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून नंद घरमध्ये पौष्टिक भोजन तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते आणि पोषणाच्या प्रवासात त्यांना सक्रिय सहभागी बनवले जाते.
आतापर्यंत या कार्यक्रमात सुमारे २ लाख मातांचा सहभाग झाला असून, जवळपास १५ लाख भोजन तयार करण्यासाठी सहकार्य करण्यात आले आहे. योग्य माहिती आणि भोजन तयार करण्यातील सक्रिय सहभागाच्या माध्यमातून मातांना सक्षम केल्यास मुलांच्या आणि कुटुंबांच्या दैनंदिन पोषणविषयक सवयी अधिक मजबूत करता येतात तसेच त्यांच्या आरोग्य आणि कल्याणात योगदान देता येते, हे या कार्यक्रमातून दिसून येते.
वेदांता समूहाचे चेअरमन श्री. अनिल अग्रवाल म्हणाले, “माझा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की, पोषण म्हणजे प्रत्येक मुलाला जीवनात योग्य सुरुवात करून देणे. त्यात शिक्षण आणि संस्कारांची जोड दिल्यास जीवनाच्या पहिल्या सहा वर्षांतच सक्षम आणि उत्पादक जीवनाची मजबूत पायाभरणी होते. आपल्या शास्त्रांमध्येही हेच सांगितले आहे. आपल्या लोकसंख्येपैकी ५० टक्के महिला आहेत. जेव्हा महिला सशक्त आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात, तेव्हा त्याचा कुटुंब, समाज आणि अर्थव्यवस्थेवर परिवर्तनकारी परिणाम होतो. नंद घरच्या संकल्पनेमागे हेच माझे स्वप्न आहे”.
ते पुढे म्हणाले, “आज १८ राज्यांमधील १५,००० हून अधिक नंद घरांच्या माध्यमातून ५ लाखांहून अधिक मुले आणि ४ लाख महिलांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकत हे स्वप्न साकार होताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारे तसेच आमच्याशी जोडलेल्या समुदायांच्या सहकार्याने आपण ही चळवळ भारताच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो आणि अधिक आरोग्यदायी व सशक्त पिढी घडवू शकतो.” याच दृष्टिकोनाला पुढे नेत, ‘नंद घर का मिशन, संपूर्ण पोषण’ विविध समुदाय-केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून पोषणाला दैनंदिन जीवनातील वर्तन आणि कृतींशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे.
या उपक्रमांतर्गत पोषण वाटिका रोपण अभियान आणि पोषण वाटिका कुकिंग यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन केले जाईल. नंद घरांमध्ये विकसित केलेल्या किचन गार्डनच्या माध्यमातून मुलांना आणि मातांना स्थानिक पातळीवरील अन्न उत्पादनाशी जोडले जाईल आणि त्यांना ‘बियाण्यापासून ताटापर्यंत’ या संपूर्ण प्रवासाची ओळख करून दिली जाईल.
नंद घरचे शेफ स्थानिक गरजांशी सुसंगत, पौष्टिक आणि आकर्षक भोजन तयार करतील. यावेळी पारंपरिक खाद्यघटक आणि स्थानिक पाककृतींनाही प्रोत्साहन दिले जाईल.
मुलांना ताजी फळे आणि फोर्टिफाइड पोषण पूरक आहार वितरित करून या प्रयत्नांना आणखी बळ दिले जाईल. विविध आणि पोषक घटकांनी समृद्ध आहाराचे महत्त्व अधोरेखित करणे हा यामागील उद्देश आहे. या उपक्रमाद्वारे नंद घरच्या व्यापक पोषणविषयक हस्तक्षेपांचेही प्रदर्शन केले जाईल. यामध्ये बाजरीवर आधारित न्यूट्री बार, फोर्टिफाइड पोषण पूरक आहार आणि कुपोषणाशी सामना करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित प्रोजेक्ट बलवर्धन यांचा समावेश आहे.
या उपक्रमाचा भर पोषणविषयक जागरूकता आणि ज्ञान वाढविण्यावर असेल. विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये अॅनिमिया आणि लोहाच्या सेवनाशी संबंधित बाबींविषयी माहिती आणि जागरूकता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
‘पापा का पोषण’ या उपक्रमाच्या माध्यमातून वडील आणि मुलींना पोषणाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये एकत्र सहभागी करून घेतले जाईल. मुलांच्या पोषणाची जबाबदारी ही संपूर्ण कुटुंबाची सामायिक जबाबदारी आहे, हा संदेश यामधून दिला जाईल.
या उपक्रमांतर्गत व्यक्ती आणि समुदायांना स्वतःचे पोषणविषयक संकल्प करण्यासाठी तसेच त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. यामुळे पोषणविषयक जागरूकतेचे रूपांतर ठोस आणि सातत्यपूर्ण कृतीत करण्यास मदत होईल.
नंद घरचे CEO श्री. शशी अरोरा म्हणाले, “पोषण नंद घरच्या दारात संपत नाही; ते प्रत्येक आई, वडील आणि मुलासोबत त्यांच्या घरापर्यंत पोहोचते. हीच नंद घरची विचारधारा आहे आणि प्रत्येक मुलाला योग्य पोषण मिळावे तसेच कोणीही उपाशी झोपू नये, या आमचे चेअरमन श्री. अनिल अग्रवाल यांच्या दृष्टिकोनाशी ती खोलवर जोडलेली आहे. पोषण अभियान २.० अंतर्गत ९वा राष्ट्रीय पोषण माह हा पोषणाला जन आंदोलन बनविण्याच्या भारत सरकारच्या बांधिलकीची महत्त्वपूर्ण आठवण करून देतो. कुटुंबे, समुदाय आणि संस्था यांना एकत्र आणून उत्तम पोषण ही सामायिक जबाबदारी बनविण्याचा हा प्रयत्न आहे”.
ते पुढे म्हणाले, “आमच्या ‘मदर्स फूड प्रिपरेशन प्रोग्राम’ने आधीच दाखवून दिले आहे की, जवळपास २ लाख माता आपल्या मुलांच्या पोषणात सक्रिय सहभागी झाल्यास किती मोठा बदल घडवून आणता येतो. या पोषण माहमध्ये आम्ही सहभागाची ही भावना आणखी पुढे नेत आहोत. स्वयंपाक, शिक्षण आणि सामूहिक कृतीच्या माध्यमातून कुटुंबे आणि समुदायांना या प्रवासाशी जोडत आहोत, जेणेकरून उत्तम पोषण ही एक कायमस्वरूपी सवय बनेल आणि नंद घरपासून प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल.”
हे सर्व उपक्रम एकत्रितपणे पोषण सुरक्षा या संकल्पनेच्या विविध पैलूंना एका व्यासपीठावर आणतात—अन्न आणि पूरक आहार, मातांचा सहभाग, पोषणविषयक शिक्षण, कुटुंबाचा सहभाग, स्थानिक अन्न व्यवस्था, स्वच्छता आणि सरकारी कार्यक्रमांशी समन्वय.हा दृष्टिकोन पोषणशास्त्राला दैनंदिन जीवनातील त्या वर्तनांशी आणि समुदायाच्या सहभागाशी जोडतो, जे आरोग्यदायी पर्याय दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहेत.
नंद घर का मिशन, संपूर्ण पोषण’ च्या माध्यमातून नंद घर हे अधोरेखित करू इच्छिते की, पोषण सुरक्षा केवळ मुलाच्या ताटात पोहोचणाऱ्या अन्नातून निर्माण होत नाही, तर मुलाभोवती असलेले ज्ञान, पर्याय, सवयी आणि व्यक्ती यांची भूमिकाही त्यामध्ये महत्त्वाची असते. या उपक्रमाचा उद्देश उत्तम पोषण ही अशी कायमस्वरूपी सवय बनविणे आहे, जी नंद घरपासून प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि पोषण माहला सातत्यपूर्ण व दैनंदिन कृतीसाठी प्रेरणादायी संधीमध्ये रूपांतरित करेल.
सगळ्यांनाच दणका… Zepto पासून IRCTC किचन! FDA ची मोठी कारवाई; 6 मोठ्या ब्रँड्सचे परवाने थेट रद्द!