
महाराष्ट्र’चा रोडमॅप साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा पायाभूत टप्पा
सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजना देशातील पहिलीच सर्वेक्षण योजना
महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल
मुंबई: युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत 2047’ हे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ‘विकसित महाराष्ट्र’चा रोडमॅप साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा पायाभूत टप्पा आहे. शासनाच्या या संकल्पनेमध्ये युवकांच्या क्षमतेचा कल जाणून घेणारी ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजना देशातील अशी पहिलीच सर्वेक्षण योजना असून रोजगार निर्मितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याने महत्वाचे उचललेले पाऊल राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
मुंबईतील वांद्रे, खार, सांताक्रुझ पश्चिम भागातील (एच पश्चिम वॉर्ड) सुमारे 55 हजार घरांतील युवकांचा कौशल्य क्षमता कल जाणून घेण्यासाठी सुरू होत असलेल्या ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेचे उद्घाटन पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. त्यांच्याच संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे सर्वेक्षण मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिम येथील नॅशनल कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या योजनेच्या उद्घाटन समारंभास स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह कौशल्य विकास उपायुक्त आनंद माळी, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे विभागीय संचालक सी.एस. मूर्ती, कौशल्य विकास विभाग मुंबईचे उपायुक्त सचिन जाधव, सहायक आयुक्त शैलेश भगत, नॅशनल कॉलेजच्या प्राचार्य नेहा जगतियानी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागातील अधिकारी, उद्योजक, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.
भारत हा तरुणांचा देश आहे, आताच्या तरुणाईला शिक्षणाबरोबर उद्याच्या विकासाची ओळख करून देण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. #Mumbai #AshishShelar pic.twitter.com/6OgxotEqW3 — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 2, 2026
पालकमंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले, भारताकडे लोकसंख्येचे सामर्थ्य आहे. युवकांना योग्य दिशा, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीची संधी मिळत असल्याने भारत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करू शकतो. ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ हा युवकांच्या क्षमता आणि कौशल्य कल जाणून घेण्यासाठीचा देशातील पहिला उपक्रम आहे. एआय-आधारित आणि पारदर्शक पद्धतीने 18 ते 40 वयोगटातील युवकांचा सर्वेक्षणाद्वारे डेटा संकलित करुन त्याआधारे युवकांची कौशल्ये ओळखून त्यांना प्रशिक्षण संस्थांशी जोडले जाईल.
“…तसेच समाजासाठी डिजिटल आरोग्य अनिवार्य”; सायबर धोक्यांबाबत आशिष शेलारांचे भाष्य
या सर्वेक्षणानंतर 2027 पर्यंत सुमारे 15 हजार युवकांना प्रशिक्षण देण्याचा आणि त्यापैकी पाच हजार युवकांना रोजगार किंवा उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याचा संकल्प आहे. यासाठी उद्योग, विविध कंपन्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी समन्वय साधून रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी साखळी व्यवस्था उभी केली जाईल. यासाठी शासनाबरोबरच महाविद्यालयांनी आणि युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड शेलार यांनी केले.