
फोटो सौजन्य - Social Media
पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दीर्घकाळ शाळेशी जुळलेल्या नात्याला निरोप देताना अनेक विद्यार्थी भावूक झाल्याचे चित्र या समारंभात पाहायला मिळाले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वागत गीताने झाली. या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक दिलीप सपकाळ होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे, तसेच जितेंद्र पाडवे हे प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी महाविद्यालयात वर्षभर राबविण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वकृत्व स्पर्धा, तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. निरोप समारंभात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले क्षण आणि शाळेतील अनुभव यांची आठवण काढताना अनेक विद्यार्थी भावूक झाले. या आठवणींच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आला. नृत्य, गीत व इतर सादरीकरणांनी वातावरण आनंदी झाले. यावेळी प्रा. योगेश निंभोरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्टिकोन आत्मसात करण्याचा सल्ला देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर जितेंद्र पाडवे यांनी दहावी व बारावीनंतर उपलब्ध असलेल्या करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, वेळेचे योग्य नियोजन तसेच मोबाईल व तंत्रज्ञानाचा सदुपयोग याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात दिलीप सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना सत्य, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकता या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले. “सातत्यपूर्ण अभ्यास आणि परिश्रमाची साथ असल्यास यश निश्चित मिळते,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री चापे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृष्णा पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप जाधव, प्रदीप चिकाटी, कानडजे, कृष्णा भांडारे, सुनील तांबे, राजेश ठोंबरे, सुनील सागरे, भास्कर केरले, महादेवी ठवरे, प्रफुल कळम, विकी चांदुरकर, गजानन सपकाळ, डॉ. गणेश दिवटे, डॉ. रमेश काळे, संजय जाधव, अक्षय निकम यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.