
फोटो सौजन्य - Social Media
परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर आणि महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात असून, विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना केले आहे. आगामी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षा येत्या १० फेब्रुवारीपासून सुरू होत असून, इयत्ता दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी सज्ज झाले असून, परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येऊ नये यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.
मंत्री दादा भुसे म्हणाले की, सर्व विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून, त्यांचा प्रामाणिकपणा आणि कष्ट हीच त्यांची खरी ओळख आहे. परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि कायम लक्षात राहणारा टप्पा असतो. गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी मेहनतीने या परीक्षांची तयारी केली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले असून, त्या कष्टांना नक्कीच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या हातात केवळ उत्तरपत्रिका नसतात, तर त्यात आई-वडिलांची स्वप्ने, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत सामावलेली असते, असे सांगत मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि शांत मन हेच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले.
परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, पुरेशी झोप घ्यावी, सकस व संतुलित आहार घ्यावा आणि मन शांत ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचणे, आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे आणि नियमांचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना मंत्री भुसे म्हणाले की, कष्ट, जिद्द आणि पालक-शिक्षकांच्या आशीर्वादाच्या बळावर विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील आणि स्वतःबरोबरच राज्याचे नाव उज्ज्वल करतील. परीक्षा ही शेवट नसून नव्या संधींची सुरुवात आहे, असा सकारात्मक संदेश देत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.