फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या आरटीई (Right to Education) अंतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी पूर्ण करण्यात आली असून, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील एकूण ७९० खासगी शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये ८ हजार ६११ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शाळा नोंदणी व पडताळणीची प्रक्रिया ९ जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता शासनाच्या सूचनांनुसार विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाचे उद्दिष्ट शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आहे.
आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक २२६ शाळांमध्ये २,५४२ जागा उपलब्ध आहेत. अकोला जिल्ह्यात १८३ शाळांत १,९७७ जागा, यवतमाळ जिल्ह्यात २०० शाळांत २,१७२ जागा, वाशीम जिल्ह्यात ९५ शाळांत १,००७ जागा, तर बुलडाणा जिल्ह्यात ८६ शाळांत ९१३ जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच अमरावती विभागात आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाल्या आहेत.
गेल्या शैक्षणिक वर्षात अमरावती विभागात आरटीई अंतर्गत सुमारे ७ हजार जागांवर प्रवेश झाले होते. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये प्रवेश प्रक्रियेनंतरही शेकडो जागा रिक्त राहिल्या होत्या. तरीही बहुतांश प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा दिलासा मिळाला होता. याच धर्तीवर यंदाही वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, “आरटीई अंतर्गत शाळा नोंदणी आणि पडताळणीचा टप्पा पूर्ण झाला असून, आता विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाकडून अंतिम सूचना मिळण्याची प्रतीक्षा आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.”
आरटीई प्रवेश प्रक्रियेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित व अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची संधी मिळते. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष आता विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया नेमकी कधी सुरू होते, याकडे लागले असून, यंदा अमरावती विभागात आरटीई प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.






