
फोटो सौजन्य - Gemini
छत्रपती संभाजीनगर येथे हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात जिल्ह्यातील शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत २२ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम टीव्ही सेंटर परिसरातील मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे शनिवार, ४ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे चेअरमन हसीन अख्तर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे तसेच जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश गलांडे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगल पांचाळ, माजी नगरसेवक शेख बाबू, प्रदीप विखे, एम. एम. खुटे, रमाकांत, दिलीप ढाकणे, विजय साळकर, नवाब नकाशब्दी, डॉ. प्रा. शाहेद आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईद मिलाद-उन-नबी निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पुस्तक, ट्रॉफी, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत राज्यभरातून मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी राज्यातील ६ शिक्षकांची निवड करण्यात आली, तर जिल्हास्तरावर ९ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. हसीन अख्तर यांनी शिक्षकांनी समाज घडविण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन केले. तर आमदार विक्रम काळे यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांवर आता अधिक जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुजीब आलम खान यांनी केले, तर प्रास्ताविक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी केले. आभार प्रदर्शन शफिक पठाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेख शब्बीर, शफीक पठाण, शाहरुख पठाण, सय्यद ताजीम, अमोल कुळकर्णी, अॅड. इरफान खान, शेख जफर, शेख साबीर, शेख यासेर, फरमान खान, इलियास सिद्दीकी, शेख अलीम, शाहीन नाज, इम्रान खान आदींनी विशेष परिश्रम घेतले.