(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी साडेपाच हजार प्राध्यापकांची भरती मार्चअखेरीस पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन सप्टेंबर २०२५ मध्ये देण्यात आले होते. मात्र, आता ही भरती प्रक्रिया जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, त्यासंदर्भात विद्यापीठांना सूचना दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांना दिली.
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्याचा विद्यापीठे, महाविद्यालयांच्या कामकाजाला फटका बसत आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीची मागणी राज्यातील पात्रताधारक उमेदवारांनी अनेकदा केली आहे, त्यासाठी आंदोलनेही होत आहेत. प्राध्यापक भरतीच्या तारखांबाबत विचारण्यात आल्यावर ‘तारीख पे तारीख’ दिली जात होती.
“विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. गेल्या २०-२५ वर्षातील ही सर्वात मोठी भरती ठरणार आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये ७०० प्राध्यापक, तसेच अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांची पदे भरण्यासही मंजुरी दिली आहे,” असे पाटील यांनी सांगितले.
राज्य शासनाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे राज्यभरातील सुमारे साडेपाच हजार पदे पुढील काळात भरली जाणार आहेत. 1 ऑक्टोबर 2025 च्या विद्यार्थी संख्येवर आधारित ही पदे भरली जाणार आहेत. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांना विषयनिहाय पदांचा तपशील कळविण्यात आला आहे. परिणामी आता महाविद्यालयाकडून रोस्टर तपासणीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण होणे अपेक्षित आहे.






