
फोटो सौजन्य - Social Media
देशात लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP)नुसार आता महाराष्ट्रातही नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी केली जाणार आहे. २०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून या बदलांची सुरुवात होणार असून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीपासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे.
पुढील वर्षांत टप्प्याटप्प्याने इतर वर्गांनाही हा अभ्यासक्रम लागू केला जाईल. नवीन अभ्यासक्रमाशी विद्यार्थ्यांना सहज जुळवून घेता यावे यासाठी ‘सेतू अभ्यासपुस्तिका’ही तयार केली जात आहे. या पुस्तिकेद्वारे विद्यार्थ्यांना खेळकर आणि कौशल्याधारित पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करण्यासाठीही या उपक्रमाचा उपयोग होणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या माध्यमातून ही सेतू पुस्तिका तयार केली जात असून पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम बालभारतीमार्फत केले जाणार आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यस्तरावर अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. नवीन धोरणानुसार शिक्षण व्यवस्थेची रचना आधीच बदलण्यात आली आहे. त्यानुसार केजी ते दुसरीपर्यंत पूर्वप्राथमिक, तिसरी ते पाचवी प्राथमिक, सहावी ते आठवी माध्यमिक आणि नववी ते बारावी उच्च माध्यमिक स्तर असे विभाजन करण्यात आले आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे.
अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचा आराखडा देखील निश्चित करण्यात आला आहे. २०२६-२७ मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी; २०२७-२८ मध्ये पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी; तर २०२८-२९ मध्ये आठवी, दहावी आणि बारावीमध्ये नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल. नवीन अभ्यासक्रमात अनुभवाधारित, सर्वसमावेशक आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच संख्याज्ञान, सर्जनशीलता आणि स्थानिक गरजांनुसार विषयवस्तूंचा समावेश करण्यात येणार आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक आनंददायी, कौशल्याधारित आणि भविष्योन्मुख होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.