फोटो सौजन्य - Social Media
राज्यात Right to Education Act (आरटीई) अंतर्गत २५ टक्के प्रवेशप्रक्रियेला यंदा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी सुरू असलेल्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत अवघ्या नऊ दिवसांत तब्बल ९० हजार ३७५ अर्ज दाखल झाले आहेत. १७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत राज्यातील ८ हजार ६५१ शाळांमधील १ लाख १२ हजार ७७२ जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना स्वयंअर्थसहाय्यित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली जाते.
पालकांचा इंग्रजी माध्यमातील खासगी शाळांकडे वाढता कल स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जागांपेक्षा अर्जांची संख्या जास्त असल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. विदर्भातील आकडेवारी पाहता एकूण २३ हजार ४३६ अर्ज दाखल झाले असून नागपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. अमरावती येथे २ हजार ४४२ जागांसाठी २ हजार ८२५ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर नागपूरमध्ये ६ हजार ९९४ जागांसाठी तब्बल ९ हजार ४२८ अर्ज दाखल झाले आहेत. अकोला (१८०१), बुलडाणा (१६७१), यवतमाळ (१६८७), चंद्रपूर (१६६८) या जिल्ह्यांतही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र गडचिरोलीत केवळ २८७ अर्ज आल्याने तुलनेने कमी प्रतिसाद दिसतो.
राज्याच्या इतर भागातही मिश्र चित्र दिसून येते. मुंबईत ५ हजार ९३९ जागांसाठी ३ हजार २०० अर्ज आले आहेत. ठाणे जिल्ह्यात ११ हजार ५९५ जागांसाठी ९ हजार ८४६ अर्ज दाखल झाले आहेत. संभाजीनगरमध्ये ४ हजार ८२३ जागांसाठी ४ हजार ८७९ अर्ज आले असून येथे अर्जांची संख्या किंचित जास्त आहे. कोल्हापूरमध्ये ३२९ जागांसाठी १ हजार २१२ अर्ज आले आहेत.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. येथे १७ हजार ५०९ जागांसाठी १७ हजार ५५६ अर्ज दाखल झाले आहेत. जळगावमध्ये मात्र ३ हजार ३१० जागांसाठी २ हजार ८२ अर्ज प्राप्त झाले असून अर्जांचा वेग तुलनेने कमी आहे. १० मार्च ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असल्याने येत्या काही दिवसांत अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेशासाठी स्पर्धा अधिक तीव्र होणार असून पालकांनी वेळेत अर्ज सादर करणे गरजेचे ठरणार आहे.






