
फोटो सौजन्य - Social Media
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत राबविण्यात येणारे सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून कोणताही कार्यक्रम बंद करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीचा विचार करून काही प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प संचालकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
महाज्योतीकडून एकूण ११ प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये संघ लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा व संयुक्त गट ब व क तसेच मिलिटरी भरती प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात सुरू आहेत. UPSC प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रतिमाह १३ हजार रुपये विद्यावेतन आणि एकवेळ १८ हजार रुपये आकस्मिक निधी दिला जातो. तर MPSC व इतर प्रशिक्षणासाठी प्रतिमाह १० हजार रुपये आणि एकवेळ १२ हजार रुपये निधी दिला जातो. त्यामुळे या योजनांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून विद्यावेतनही नियमित सुरू राहणार आहे.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात विविध प्रशिक्षणांत हजारो विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. अभियांत्रिकी सेवा, कर्मचारी निवड आयोग, मिलिटरी भरती, एमबीए प्रवेश परीक्षा, UGC-NET तसेच JEE/NEET सारख्या परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे JEE/NEET प्रशिक्षण ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२१ पासून ऑनलाईन स्वरूपात सुरू आहे. दरम्यान, IBPS, SSC, रेल्वे भरती आणि अभियांत्रिकी सेवा यांसारख्या परीक्षांचे स्वरूप ऑनलाईन असल्याने २०२६-२७ पासून हे प्रशिक्षणही ऑनलाईन करण्याचा प्रस्ताव आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि डेटा सिम देण्यात येणार असून त्याद्वारे घरबसल्या शिक्षण घेता येणार आहे.
महाज्योतीकडे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी तब्बल ४४,९०३ अर्ज प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांमध्ये याबाबत मोठी मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः आर्थिक अडचणीमुळे किंवा घरगुती जबाबदाऱ्यांमुळे बाहेर जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. ऑनलाईन प्रशिक्षणात लाईव्ह लेक्चर्स, शंका निरसन, साप्ताहिक परीक्षा आणि पीडीएफ स्वरूपातील अभ्यास साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक पद्धतीने शिक्षण मिळणार असून कोणतेही प्रशिक्षण बंद नसून अधिक प्रभावीपणे सुरू असल्याचे महाज्योतीने स्पष्ट केले आहे.