फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Engineers Day 2026: भारतातील महान अभियंत्यांमध्ये सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन, त्यांचा जन्मदिवस १५ सप्टेंबर हा ‘इंजिनिअर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. अवाढव्य धरणे, जलव्यवस्थापन ते औद्योगिक विकासापर्यंत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मूर्त रूप देण्यात एम. विश्वेश्वरय्या यांचे योगदान मोलाचे राहिले आहे.
विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटकातील मुद्देनहल्ली येथे झाला. त्यांनी पुण्यातील ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ (COEP) मधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात काम सुरू केले. पुढे ते म्हैसूर राज्याचे मुख्य अभियंता बनले. त्यांच्या या महान योगदानाबद्दल त्यांना १९५५ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात आले.
एम. विश्वेश्वरय्या यांच्या महान कार्यांमध्ये कृष्णराज सागर धरणाचे नाव सर्वात वर येते. कावेरी नदीवर बांधलेल्या या धरणाचे नियोजन आणि अभियांत्रिकी रचनेमध्ये विश्वेश्वरय्या यांची मुख्य भूमिका होती. या प्रकल्पामुळे म्हैसूर आणि आसपासच्या भागात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भक्कम झाली.
१९०८ मध्ये हैदराबादमध्ये मुसी नदीला विनाशकारी पूर आला होता. यानंतर शहराला पुराच्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी विश्वेश्वरय्या यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी हैदराबादमध्ये पूर-नियंत्रण, ड्रेनेज सिस्टीम आणि जलाशयांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. त्यांच्या सल्ल्यामुळे शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी आधुनिक यंत्रणा विकसित करण्यात आली.
एम. विश्वेश्वरय्या यांनी जलाशयांमधील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी एक नाविन्यपूर्ण ऑटोमॅटिक गेट सिस्टीम शोधून काढली, ज्याला ‘स्लुइस गेट’ म्हटले जाते. या तंत्रज्ञानाचा वापर पुढे भारतातील अनेक मोठ्या धरणांमध्ये करण्यात आला.
विशाखापट्टणम बंदराला समुद्राच्या वाळूमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी आणि त्याच्या सुरक्षेसाठी विश्वेश्वरय्या यांचा विशेष सल्ला घेण्यात आला होता.
ते भारतातील औद्योगिकीकरणाचे मोठे पुरस्कर्ते होते. १९१२ ते १९१८ या काळात म्हैसूरचे दिवाण म्हणून काम करताना त्यांनी उद्योग, शिक्षण, बँकिंग आणि तांत्रिक संस्थांच्या विकासावर भर दिला. म्हैसूरमधील अनेक औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.






