
फोटो सौजन्य - Social Media
राज्यभरात बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्या असून दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाताना आणि परीक्षा देताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. योग्य नियोजन, शांत मन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर उत्तम यश मिळवता येते. चला, जाणून घेऊया महत्त्वाच्या सूचना.
परीक्षा केंद्रावर जाताना घ्यावयाची काळजी
परीक्षेच्या दिवशी वाहतूक कोंडीचा विचार करून घरातून लवकर निघणे गरजेचे आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असते. उशीर झाल्यास अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकतो.
प्रवेशपत्र (हॉल तिकीट) आणि शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय आवश्यक साहित्य जसे की पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, मोजपट्टी, कंपास, लेखन पॅड आणि पाण्याची बाटली सोबत घ्यावी. परीक्षागृहात कोणतेही पुस्तक, वही, मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होऊ शकते.
परीक्षा देताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
प्रश्नपत्रिका मिळेपर्यंत मन शांत ठेवा. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ती काळजीपूर्वक वाचा. एखादा प्रश्न अवघड वाटला तरी घाबरू नका आणि प्रश्न सोपा वाटला तरी घाई करू नका. वेळेचे योग्य नियोजन करून सर्व प्रश्न आत्मविश्वासाने सोडवा.
उत्तरपत्रिकेवरील सर्व माहिती जसे की आसन क्रमांक, विषय कोड इत्यादी अचूक आणि स्पष्ट लिहा. अक्षर सुवाच्य ठेवा. उत्तरपत्रिकेवर अनावश्यक लिहिणे किंवा खोडामोड टाळा. बारकोड चिकटवण्यापूर्वी तो आपलाच असल्याची खात्री करा.
काही अतिरिक्त सूचना
परीक्षेपूर्वी पुरेशी झोप घ्या आणि हलका आहार घ्या. शेवटच्या क्षणी घाईघाईने अभ्यास करण्यापेक्षा आधी केलेल्या तयारीवर विश्वास ठेवा. सकारात्मक विचार ठेवा आणि तणावापासून दूर राहा.
योग्य नियोजन, नियमांचे पालन आणि आत्मविश्वास यांच्या मदतीने विद्यार्थी नक्कीच चांगले यश मिळवू शकतात. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!