
IIT Kharagpur
देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले IIT हे खरगपूर येथे सुरू झाले. सुरवातीला त्याचे वर्ग कोलकत्याच्या ‘एस्प्लानेड ईस्ट’ मधील एका इमारतीत भरत होते. पण काही महिन्यातच ते खरगपूच्या ‘हिजली’ परिसरात हलवण्यात आले. हीच जागा आज IIT खरगपूर म्हणून ओळखली जाते. १८ ऑगस्ट १९५१ रोजी मैलना अबुल कलाम् आझाद यांनी याचे औपचारिक उद्घाटन केले. त्यापूर्वीच या संस्थेचे नाव ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (IIT) असे ठेवण्यात आले होते.
हिजली येथील इमारत पूर्वी हिजली डिटेंशन कॅम्प होती. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात कोणताही खटला न चालवता तरूणांना या इमारतीत कैद करून ठेवले जात होते. १६ सप्टेंबर १९३१ रोजी येथील दोन निशस्त्र कैद्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली होती. पुढे हीच इमारत शिक्षणाचे केंद्र बनली. तुरुंगातून सुरू झालेली जगातील ही कदाचित एकमेव मोठी शिक्षण संस्था आहे.
या कॅम्पसची रचना प्रसिद्ध वास्तुविशारद डॉ. वर्नर मोसर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मार्च १९५२ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नवीन इमारतीची पायाभरणी केली. नंतर उद्योग मंत्रालयाच्या मदतीने येथे अनेक आधुनिक यंत्रसामग्री मागवण्यात आल्या. सुरुवातीच्या काळात येथे अनेक परदेशी प्राध्यापक ही शिकवण्यासाठी आले होते. महान शास्त्रज्ञ सर जे.सी.घोष हे खरगपूरचे पहिले संचालक होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली या संस्थेचा पाया मजबूत झाला.
१५ सप्टेंबर १९५६ रोजी संसदेत एक कायदा मंजूर करण्यात आला. ज्यानुसार IIT खरगपूरला राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेचा (Institute of National Importance) दर्जा देण्यात आला. तसेच याला स्वयत्त विद्यापीठाचाही दर्जा मिळाला.