
फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) या दोन्ही परीक्षा येत्या २६ एप्रिल २०२६ रोजी एकाच दिवशी संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी शाळा नोंदणी तसेच विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची अंतिम तारीख १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी अर्ज करतात. मात्र काही शाळा आणि पालकांकडून नोंदणी प्रक्रियेसाठी अधिक वेळ देण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेने वेळापत्रकात बदल करत विद्यार्थ्यांना आणि शाळांना अतिरिक्त मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार शाळा माहिती प्रपत्र, विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे तसेच परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ फेब्रुवारी २०२६ असून, विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १४ ते २० फेब्रुवारी २०२६ असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यानंतर अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत २१ ते २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत देण्यात आली आहे. याशिवाय, अति विशेष विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी शेवटची संधी २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र २८ फेब्रुवारी २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिले आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षा ही गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळते तसेच स्पर्धात्मक परीक्षांची लवकर ओळख होते. त्यामुळे पालक, शिक्षक आणि शाळा प्रशासनाने वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांचे अर्ज भरावेत, असे आवाहन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी परीक्षा परिषदेकडून ऑनलाईन प्रणाली अधिक सक्षम करण्यात आली आहे. तरीही अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वेळेत अर्ज न भरल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहावे लागू शकते, त्यामुळे पालकांनी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.