
फोटो सौजन्य - Social Media
मराठी शाळा हा मराठी जनतेसाठी असणारा एक भावनात्मक विषय आहे. कारण आधीच या शाळांचे प्रमाण कमी झाले आहे. (Marathi School in Mumbai) मराठी माध्यमातून शिक्षण घेत मोठे झालेल्या अनेक महाशयांना मराठी शाळा कमी वाटते, कारण त्यातील बहुतेक जणांना आपल्या पाल्याला चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचीच ओढ असते. अशात एक बातमी समोर आली आहे. मुंबईतील काही मराठी शाळा पाडले जाणार असल्याचे आदेश महानगर पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच यामागचे कारणही स्पष्ट केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “या शाळांची अवस्था पडीक आहे. त्यामुळे फक्त मराठी माध्यमच नव्हे तर पडीक अवस्थेत असणाऱ्या इतर माध्यमांच्या शाळाही पाडण्यात येणार आहेत.”
महानगर पालिकेच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिक तसेच मराठी भाषाप्रेमी सामाजिक संस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील धारावी येथे आंदोलनाला सुरुवात झाली होती. या आनंदोलनात अनेक मराठी प्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला होता. यात विशेष सहभाग म्हणजे डॉ. दीपक पवार, चिन्मया सुमित, अॅड. गिरीश राऊत, जनार्दन जंगले, अॅड. प्रणाली राऊत! उपस्थित नागरिकांनी स्थानिक महानगर पालिकेवर तसेच प्रशासनावर घणाघाती आरोप केल्याचे दिसून आले आहे.
नागिरकांचा आरोप आहे की शाळा अतिशय चांगल्या स्थितीत आहेत आणि पालिकेचा हा निर्णय बिल्डरला जागा मिळवून देण्याचा निव्वळ एक प्रयत्न आहे. नागरिकांनी पालिकेने सांगितलेल्या कारणावर अविश्वास दाखवून आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव करून दिली आहे. पालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट सार्वजनिक करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. जेणेकरून सदर शाळांची अवस्था खरंच पडीक आहे की हा सगळा बिल्डरसाठी मांडलेला खेळ आहे? हे सत्य समोर येईल.
दरम्यान, नागिरकांनी राजकीय नेत्यांवर टीका केली आहे. “स्वतः जनतेला मराठी शाळांमध्ये शिका! असे प्रचार करायचे आणि स्वतःच्या मुलांना शिकण्यासाठी बाहेरगावी किंवा कोणत्या तरी स्टॅंडर्ड खाजगी शाळेत टाकायचं” अशा टीका करण्यात येत आहेत. सुस्थितीतल्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
(Marathi School will be demolished in Mumbai)