
NEET पेपरफुटीचे धागेदोरे कल्याणपर्यंत; म्हारळमधील विद्यार्थिनीची CBIकडून चौकशी
Khan Sir Life Story: ४० रुपयांच्या कमाईपासून कोट्यवधींच्या मालकापर्यंत, कसा आहे खान सरांचा प्रवास?
शहरामध्ये विविध चर्चांना उधाण
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेपरफुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयच्या विशेष पथकाने संबंधित विद्यार्थिनीच्या घरी भेट देत तिचा जबाब नोंदवला. तपासात संशयितांच्या यादीत असलेल्या एका विद्यार्थ्यांच्या कॉल डिटेल्स आणि संपकांची छाननी करताना या विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे.
त्यानंतर या संपर्काच्या आधारे सीबीआयचे पथक कल्याणमध्ये दाखल झाले आणि विद्यार्थिनीची सखोल चौकशी करण्यात आली. संबंधित विद्यार्थिनी आणि संशयित विद्यार्थी यांच्यातील संपर्काचे स्वरूप काय होते, त्याचा पेपरफुटी प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. या संदर्भात विद्यार्थिनीच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. मात्र, त्यांच्या मुलीचा एका विद्यार्थ्यांसोबत संपर्क होता आणि त्याच कारणामुळे तिचा मोबाईल क्रमांक तपास यंत्रणांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले, सीबीआय अधिकाऱ्यांनी घरी येऊन प्राथमिक चौकशी केल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित विद्यार्थिनीचा थेट सहभाग असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिची भूमिका केवळ संपर्कापुरती मर्यादित होती की, पेपरफुटी रॅकेटशी तिचा काही संबंध होता, याचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. सीबीआयच्या या कारवाईनंतर कल्याणमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नक्की काय घडलं होत?
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET UG) ही भारतातील सर्वात मोठी परिक्षा मानली जाते. विद्यार्थी वर्षभर भरपूर मेहनत घेऊन परिक्षेची तयारी करतात. ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेल्या या परिक्षेची प्रश्नपत्रिका आधीच लीक झाल्याची माहिती उघडकीस आली ज्यानंतर हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकलं. पेपर कॅन्सल झाल्याने अनेक विद्यार्थांनी आत्महत्या केली तर पेपरफुटीच्या या प्रकरणात कुणाकुणाचा समावेश आहे याचा शोध घेतला जात आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)