
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद, अर्ज करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत अंतिम मुदत
सोनाजी गाढवे/पुणे : राज्यातील अकरावी प्रवेशासाठी १० एप्रिलपासून सुरू झालेल्या केंद्रीय ऑनलाइन पध्दतीचा अवलंब केला असून, अर्ज नोंदणीला प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच दोन लाख ६० हजार ५९५ हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्जाच्या ‘भाग-एक’ साठी नोंदणी केली आहे.
यंदा प्रवेश प्रक्रिया वेळेआधी सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आणि महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाची निवड करणे यासाठी अधिक कालावधी उपलब्ध झाला आहे. राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीला यंदाही प्राधान्य देण्यात आले असून विद्यार्थ्यांनी अधिकृत https://mahafyjcadmissions.in/. संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रवेश अर्ज अचूक भरता यावा यासाठी शाळांच्या माध्यमातून मार्गदर्शनावर भर देण्यात येत आहे. याशिवाय विविध शाळांमध्ये मार्गदर्शक केंद्रे उभारण्यात येत असून हेल्पलाइनद्वारेही विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसोबत विविध कोटा अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणांच्या आधारे महाविद्यालयांची पसंती नोंदविता येणार आहे.
मागील वर्षी प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्याने अंतिम फेऱ्या डिसेंबरपर्यंत सुरू होत्या. मात्र, यंदा प्रक्रिया वेळेत सुरू झाल्याने ती नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरून सर्व कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अर्ज नोंदणीची मुद्त
अकरावी प्रवेश प्रक्रियेची सुरुवात १० एप्रिलपासून झाली असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. सध्या अर्जाचा ‘भाग-एक’ सुरू आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ‘भाग-दोन’ प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार सर्व टप्पे पूर्ण करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दहावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि उत्पन्न प्रमाणपत्र तयार ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय आधार कार्ड आणि अलीकडील छायाचित्र आवश्यक आहे. कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात.
अकरावीची विभागनिहाय आकडेवारी
| विभागांची नावे | अर्ज नोंदणी | विद्यार्थी | विद्यार्थींनी |
|---|---|---|---|
| अमरावती | ५,८०७ | २,८३३ | २,८६१ |
| छ.संभाजीनगर | ५,३२० | २,५६५ | २,५७१ |
| कोल्हापूर | ७,३९९ | ३,५२२ | ३,८७२ |
| लातूर | ३,८१४ | १,८७२ | १,९३१ |
| मुंबई | २२,०१७ | १०,३९५ | ११,५२१ |
| नागपूर | ५,८३१ | २,२६४ | ३,२०४ |
| नाशिक | ८,२०१ | ४,०८३ | ४,१०६ |
| पुणे | १९,३८० | ९,३७२ | ८,९५६ |
| लागू नाही (NA) | २०० | ९६ | ६८ |
| इतर प्रदेश | ९२,४५९ | ४९,५२४ | ४६७०१ |