
फोटो सौजन्य - Social Media
ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अंतराळ संशोधन क्षेत्राची ओळख व्हावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत विशेष इस्रो विज्ञान सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राज्यातील ‘विजाभज’ आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थी Indian Space Research Organisation (इस्रो) येथे शैक्षणिक सहलीसाठी जाणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली.
मंत्री सावे म्हणाले की, आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या संधींबाबत पुरेशी माहिती व मार्गदर्शन मिळत नाही. ही दरी कमी करण्यासाठी शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. विज्ञान विषयाविषयी जिज्ञासा निर्माण करणे, संशोधनवृत्ती वाढविणे आणि उच्च शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
राज्यातील ९८० ‘विजाभज’ आश्रमशाळांमधून इयत्ता ९ वी आणि ११ वीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता परीक्षा घेण्यात आली. त्यातून ५० विद्यार्थी आणि ५० विद्यार्थीनी अशा एकूण १०० जणांची निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये उपग्रह निर्मिती प्रक्रिया, प्रक्षेपण तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन प्रकल्प यांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. रॉकेट प्रक्षेपणाचे अवलोकन करण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांशी संवाद साधून अनुभवाधारित शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांचा प्रवास विमानाने करण्यात येणार असून सुरक्षितता आणि सुसूत्र नियोजनावर विशेष भर देण्यात आला आहे. उत्कृष्ट निवास व्यवस्था, आवश्यक साहित्य आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विभागामार्फत असा व्यापक उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात येत असल्याचेही मंत्री सावे यांनी नमूद केले.
१५ फेब्रुवारी रोजी विद्यार्थी Pune येथे पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व नॅशनल वॉर मेमोरियलला भेट देतील. १६ फेब्रुवारी रोजी Indian Institute of Science Education and Research Pune येथे प्रयोगाधारित कार्यशाळा व शास्त्रज्ञांशी संवाद आयोजित करण्यात आला आहे. त्याच दिवशी पुणे विमानतळावर मंत्री अतुल सावे व विभागाचे सचिव विद्यार्थ्यांना इस्रो दौऱ्यासाठी हिरवी झेंडी दाखवतील.
१७ फेब्रुवारी रोजी Bengaluru येथे विश्वेश्वरय्या औद्योगिक व तंत्रज्ञान संग्रहालय, हिंदुस्तान विमान निर्मिती वारसा संग्रहालय आणि लालबाग वनस्पती उद्यानाला भेट दिली जाईल. १८ फेब्रुवारी रोजी विद्यार्थी Thiruvananthapuram (थुंबा) येथील इस्रो केंद्र, उपग्रह प्रदर्शन विभाग व प्रक्षेपण तंत्रज्ञान गॅलरीला भेट देतील. तसेच नेपियर संग्रहालय आणि कोवलम समुद्रकिनाऱ्यालाही भेट दिली जाईल. १९ फेब्रुवारी रोजी Kanyakumari येथे पद्मनाभपुरम राजवाडा, विवेकानंद शिला स्मारक, तिरुवल्लुवर पुतळा, गांधी स्मारक तसेच सूर्यास्त दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांशी जोडून त्यांच्या स्वप्नांना नवी उंची देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रयत्न असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले. “तांड्यापासून अंतराळापर्यंत” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवित ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आकांक्षांना शासनाची ठोस साथ मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.