फोटो सौजन्य - Social Media
मुंबई विद्यापीठ यांनी शून्य विद्यार्थी नोंदणी आणि कालबाह्य अभ्यासक्रमांच्या पार्श्वभूमीवर तब्बल ३०४ परीक्षा निष्क्रिय घोषित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित अभ्यासक्रमांच्या परीक्षा यापुढे नियमितपणे घेतल्या जाणार नाहीत. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन ते तीन शैक्षणिक वर्षांपासून ज्या अभ्यासक्रमांना एकाही विद्यार्थ्याने नोंदणी केलेली नाही, अशा १२५ परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या अभ्यासक्रमांचा कालावधी पूर्ण होऊन १० वर्षांचा टप्पा पार झाला आहे, अशा १७९ परीक्षा देखील बंद करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे एकूण ३०४ परीक्षा ‘निष्क्रिय’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
शून्य नोंदणी असलेल्या १२५ परीक्षांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील २३, मानवविज्ञान विद्याशाखेतील १५, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांतील ४२ आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील ४५ परीक्षांचा समावेश आहे. मागील काही वर्षांत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, १० वर्षांपूर्वी बंद झालेल्या अभ्यासक्रमांच्या १७९ परीक्षांचाही यात समावेश आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील १०, वाणिज्य व व्यवस्थापनातील ८६, मानवविज्ञानातील ३८ आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांतील ४५ परीक्षा आहेत. विद्यापीठाने १० फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. संबंधित परीक्षांची यादी परिपत्रकाच्या परिशिष्ट १ आणि २ मध्ये उपलब्ध असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने नमूद केले आहे.
तथापि, भविष्यात कोणत्याही संलग्नित महाविद्यालय किंवा संस्थेकडून या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी नोंदणीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यास, संबंधित अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची बदलती आवड, नवीन अभ्यासक्रमांची वाढती मागणी आणि कालबाह्य विषयांचा कमी होत चाललेला प्रतिसाद या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.






