
फोटो सौजन्य - Social Media
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी शिक्षकांचे प्रलंबित वेतन तातडीने अदा करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आंबेडकर जयंती हा देशभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी नवीन कपडे, मिठाई, घरांची सजावट आणि रोषणाई यासाठी नागरिकांकडून खर्च केला जातो. मात्र, सध्या शिक्षक वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असून त्यांना दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळातही त्यांच्या घरात आर्थिक ताण कायम असल्याचे चित्र आहे.
फेब्रुवारी महिन्यापर्यंत शिक्षकांच्या पगारातून आयकर कपात होत असल्याने त्यांच्या हातात कमी रक्कम उरते. त्यामुळे मागील महिन्यात अनेक शिक्षकांकडे आर्थिक शिल्लक उरलेली नाही. त्यातच मार्च महिन्याचे वेतन वेळेवर न मिळाल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. काही शिक्षकांना कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी उधारीचा आधार घ्यावा लागत असल्याचीही बाब पुढे आली आहे.
नियमित पगार न मिळाल्याने घरखर्च, कर्जाचे हप्ते आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडताना शिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सणाच्या काळात मुलांच्या गरजा, घरातील कार्यक्रम आणि इतर खर्च यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. परिणामी, आंबेडकर जयंतीसारखा महत्त्वाचा सण साजरा करतानाही शिक्षक मेटाकुटीला येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर १४ एप्रिलपूर्वी सर्व शिक्षकांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, अशी ठाम मागणी शिक्षक समितीने शासनाकडे केली आहे. तसेच संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. शिक्षकांना वेळेवर वेतन मिळणे ही त्यांची मूलभूत गरज असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.