
pm modi
PM Modi Mann Ki Baat: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात १००० वर्ष जुन्या सुवर्णकाळाचा आणि चोल साम्राज्याच्या नौसेना इतिहासाचा विशेष उल्लेख केला आपल्यात इतिहासामध्ये असाच एक महान शासक आढळतो ज्याने केवळ दक्षिण भारतावरच नव्हे तर आशियावर आपल्या बलाढ्या नौसेनेच्या जोरावर दरारा निर्माण केला होता.
इसवी सन ९८५ मध्ये राजराजा चोल प्रथम यांनी सत्ता हाती घेतली आणि प्रशासकिय व अर्थिक सुधारणा करत चोल साम्राज्याला पुन्हा शक्तीशाली बनवले. त्यांच्या पश्चात इसवी सन १०१४ मध्ये त्यांचे पुत्र राजेंद्र चोल गादीवर आले. त्यावेळी हे साम्राज्य दक्षिणेत मालदीव आणि श्रीलंकेपासून ते थेट उत्तरेत बंगालच्या गंगा नदीपर्यंत पसरले होते. संपूर्ण दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर चोलांचे वर्चस्व असल्याने या भागाल ‘चोलमंडल’ (ज्याचे नाव पुढे कोरोमंडल झाले) म्हटले जाऊ लागले.
दक्षिण-पूर्व आशियातील व्यापार मार्गांवर नियंत्रण ठेवणारे ‘श्रीविजय साम्राज्य’ हे चोल साम्राज्याचे मुख्य सागरी स्पर्धक होते. व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी राजेंद्र चोल यांनी इसवी सन १०१७ मध्ये श्रीविजय राज्यांवर विजय मिळवला. हा इतिहासातील सर्वात लांब अंतराचे सागरी लष्करी अभियान मानले जाते. याशिवाय त्यांनी श्रीलंका, मालदीव आणि लक्षद्वीपवर पूर्ण नियंत्रण मिळवले.
राजेंद्र चोल यांनी उत्तर भारतात ओडिशा आणि बंगालच्या मार्गाने जात गंगा नदीपर्यंत धडक मारली आणि तेथील राजा महिपालचा पराभव केला. या ऐतिहासिक विजयामुळे त्यांना गंगईकोंड चोल (गंगा जिंकणारा) ही पदवी मिळाली. चोल राजवंश केवळ लष्करी शक्तीसाठी नव्हे तर त्यांनी बांधलेली भव्य मंदिरे, कला, स्थापत्य आणि मजबूत प्रशासन या सांस्कृतिक वारशासाठी आजही जगभर ओळखला जातो.