
Sardar Vallabhbhai Patel
आपल्या देशाचे पहिले उपपंतप्रधान भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल होते. याशिवाय ते भारताचे गृहमंत्रीदेखील होते. परंतु एवढ्या मोठ्या पदावर असूनही त्यांना पगार फक्त ४५ रू होता. विशेष म्हणजे ही रक्क्म आयकरमुक्त होती.
३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातच्या नडियादमध्ये जन्मलेले वल्लभभाई पटेल एका सामान्य कुटुंबातले होते. गावाकडेच शिक्षण पूर्ण करून पुढे ते यशस्वी वकील झाले. पण जेव्हा ते महात्मा गांधीच्या संपर्कात आले, तेव्हा त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. महात्मा गांधींशी जोडल्यानंतर त्यांनी शेतकरी आणि सामान्य लोकांसाठी आवाज उठवायला सुरवात केली.
खेडा, बोरसद आणि बारडोली येथील शेतकरी आंदोलनाच्या सत्याग्रहात त्यांनी शेतकरी आंदोलकाचे संघटन केले. तसेच बारडोली सत्याग्रहाच्या यशानंतर लोकांनी त्याना “सरदार” म्हणायला सुरवात केली.
स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे ते भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे मोठे नेते बनले. त्यांनी भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भाषणे दिली. त्यामुळे लोकांमध्ये अधिक उत्साह जागृत झाला यातून त्यांच्या लोकप्रियतेतही वाढ झाली. जेव्हा देश स्वातंत्र झाला तेव्हा त्यांनी पंजाब आणि दिल्लीत निर्वासितांसाठी मदत कार्य राबवले. दंगली दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यावेळी भारतात सुमारे ५६५ संस्थाने होती, जी थेट ब्रिटिश शासनाखाली नव्हती. त्या संस्थानीकांना समजावून त्यांना भारतात सामील करून घेतले. अशी कित्येक गुंतागुंतीची प्रकरणे त्यांनी अत्यंत शिस्तीने आणि सामंजस्याने हाताळली.