
फोटो सौजन्य - Social Media
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीसह पुढील सर्व वर्गांत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढावेत आणि एकही विद्यार्थी शिक्षणाबाहेर राहू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने ‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर या अभियानाची सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी दिली.
अलीकडच्या काळात जन्मदर कमी होत असल्यामुळे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. त्याचबरोबर काही मुले शाळाबाह्यही राहतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि पालकांना जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेबाबत जागरूक करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. काही खासगी शाळांकडून पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्याचाही प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेतही वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत असून या अभियानामुळे जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास अधिक वाढेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी त्यांच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगाव येथे गेल्या दोन वर्षांपासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इयत्ता पहिलीचे प्रवेश देण्याची परंपरा सुरू केली आहे. यंदाही ही परंपरा पुढे चालू ठेवण्यात येत असून जिल्हाभरातील अधिकाधिक शाळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असा संकल्प शिक्षक संघाने केला आहे. ‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ या अभियानाअंतर्गत १९ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी वर्ग घेण्यात येणार आहेत. या वर्गांमध्ये लहान मुलांना खेळ, गाणी, गोष्टी यांद्वारे शाळेच्या वातावरणाशी परिचित करून दिले जाईल. त्यामुळे मुलांना शाळेत राहण्याची सवय लागेल आणि शिक्षणाची आवडही निर्माण होईल.
या अभियानात राजेश हिवाळे, कैलास गायकवाड, संजय भुमे, बाबासाहेब जाधव, बळीराम भुमरे, प्रशांत हिवर्डे, किशोर पळसकर, बी.डी. जाधव, योगेश शिसोदे, संजय बागुल, भास्कर चौधरी, नारायण साळुंके, कल्याण राऊत, कृष्णा पाटील, लक्ष्मीकांत कोलते, पांडुरंग अंभोरे, राजू लहाने, ईश्वर वैष्णव, बाळासाहेब हिलाले, दिवाकर चोपडे, राजेश पवार, विनोद जाधव, महेश कापुरे, योगेश खरात, प्रदीप मोरे, तिलकेश्वर सिरसाट, शमीम पठाण आदी पदाधिकारी आणि शिक्षक सक्रियपणे पुढाकार घेत आहेत. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशात वाढ होईल आणि ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.