
UPSC
UPSC Prelims 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) या वेळी नागरी सेवा पूर्व परीक्षा (Civil Services Preliminary Examination 2026) संदर्भात एक मोठा आणि ऐतिहासिक बदल केला आहे. यंदापासून आयोग परीक्षा संपल्यावर केवळ एका अठवड्याच्या आत अधिकृत ‘आन्सर की’ (उत्तर तालिका) जाहीर करणार आहे. या निर्णयामुळे यूपीएससीच्या लाखो उमेद्वारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आता विद्यार्थी परीक्षा संपताच आपल्या उत्तरांची पडताळणी करू शकतील आणि आपली कामगिरी कशी राहिली समजावून घेऊ शकतील. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे उमेद्वारांना निकालाबाबत येणारा ताणही कमी होईल. तसेच त्यांना एखाद्या प्रश्नाबाबत वाद किंवा चूक अढळल्यास त्याचा आक्षेपही (Objection) नोंदवू शकतील. यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास वाढेल.
नागरी सेवा पूर्व परीक्षा दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे. पहिले सत्र सकाळी ९:३० ते ११:३० वाजेपर्यत तर दुसरे सत्र दुपारनंतर २:३० ते सायंकाळी ४:३० वाजेपर्यंत पार पडेल. परीक्षेदरम्यान सुरक्षा आणि व्यवस्थेबाबत प्रशासन पूर्णपणे सतर्क दिसून येत आहे. यंदा अनेक केंद्रे नव्याने झाल्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी धावपळ कमी होईल. तसेच त्यांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून भविष्यात गरजेनुसार आणखी शहरांमध्ये परीक्षा केंद्रे वाढवण्याचा विचार केला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले.
आयोगाचे अध्यक्ष डॉ.अजय कुमार यांनी मेरठ दौऱ्यादरम्यान सांगितले की, ३१ मे पर्यंत उमेद्वार पोर्टलवर आपली उत्तरे पाहू शकतील आणि कोणत्याही प्रश्नावर आक्षेप असल्यास तो नोंदवू शकतील. आतापर्यंत विद्यार्थ्यांना ‘आन्सर की’ मिळवण्यासाठी वाट पहावी लागत होती. मात्र, आता त्यांना अठवड्याभरातच उत्तरतालिका मिळेल. ज्यामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विद्यार्थी स्नेही होईल.