crime (फोटो सौजन्य: social media)
Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका टोळक्याने सुलेमान खान (वय 21) या तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या केली आहे. एवढाच नाही तर तर आरोपींनी त्याचा मृतदेह मूळ गावी नेला आणि घरासमोर फेकला. त्यानंतर त्याच्या आईवडिलांसह बहिणीलाही बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संतोष देशमुख सारखीच निर्घृण हत्या
मृत सुलेमानच्या कुटुंबीयांनी सांगितले की, बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्याप्रमाणेच सुलेमानलाही निर्दयतेने मारहाण करण्यात आली. १० – १५ जणांच्या टोळीने सुलेमानला चारचाकीत बसवून तीन-चार वेगवेगळ्या ठिकाणी नेलं. तिथे त्याला लाठ्या-काठ्यांनी, रॉडने आणि हातपायांनी मारहाण केली. मारहाणीच्या सततच्या फेरीनंतर, आरोपींनी शेवट त्याला त्याच्या मूळ गावी आणले. गावात आल्यावर आरोपींची सुलेमानचा मृतदेह थेट त्याच्या घरासमोर फेकून दिला. एवढ्यावरच आरोपी थांबले नाही तर त्यांनी मृतकाच्या आई-वडिलांसह बहिणीलाही निर्दयतेने मारहाण केली.
कुटुंबीयांची मागणी काय?
सुलेमानच्या कुटुंबीयांनी पोलीस व प्रशासनाकडे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. मृतदेहावरील जखमांचे आणि अमानुषतेचे स्वरूप स्पष्टपणे नोंदवता येईल. कुटुंबियांच्या मागणीनुसार, जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे पोलिस बंदोबस्तात शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे.
मकोका अंतर्गत कारवाई
कुटुंबीयांनी बीडप्रमाणेच या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, अशा टोळक्यांना कायद्याचा धाक बसण्यासाठी कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. तसेच, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात येणार आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने परिसरात बंदोबस्त वाढवला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. प्राथमिक चौकशीत वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचे संकेत मिळत आहेत, मात्र तपास पूर्ण होईपर्यंत पोलिसांनी कोणतेही ठोस कारण जाहीर केलेले नाही. जामनेरमधील या अमानुष घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, गावकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. आता या प्रकरणातील, आरोपींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गर्लफ्रेंडने लग्नाला नकार देताच तरुणाने संपवले जीव
जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रेयसीने लग्नासाठी नकार दिल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव गौरव बोरसे असे आहे. हा तरुण जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गंधाली गावातील रहिवासी आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आत्महत्या करण्याचे कारण सांगितले आहे. ही घटना ७ ऑगस्ट रोजी घडली आहे.