
आली लहर केला कहर! 112 हेल्पलाईनवर खून झाल्याची माहिती; यंत्रणेला दमवणारा 'तो' कॉलर रडारवर
नाशिक : आत्पकालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डायल ११२’ या हेल्पलाइनचा काही रिकामटेकड्यांकडून गैरवापर होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ‘आली लहर आणि केला कहर’ या अविर्भावात एका अज्ञात व्यक्तीने सातपूर एमआयडीसी भागात खून झाल्याची खोटी माहिती देऊन रविवारी (दि. २) दुपारी थेट पोलिसांचीच धावपळ उडवून दिली. शासकीय यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या या खोडसाळ कॉलरविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांतील नाशिकमधील ही अशी दुसरी घटना असल्याने खळबळ उडाली आहे.
कॉल आला, पोलिसही घटनास्थळी पण सर्वत्र शांतता
रविवारी (दि. ३) दुपारी १ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ८८३०३३४८३४ या मोबाईल क्रमांकावरून ‘डायल ११२’ वर एक कॉल आला. सातपूर एमआयडीसीमधील ‘श्री गजानन ऑटोमोबाईल’ येथे एका व्यक्तीचा खून झाला असल्याची गंभीर माहिती या कॉलरने दिली. नियंत्रण कक्षाकडून संदेश मिळताच सातपूरचे ‘टाऊन बीटमार्शल’ तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खातरजमा केली असता, तिथे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे आणि तो कॉल पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
यंत्रणा वेठीस धरल्याने गुन्हा दाखल
महत्त्वाच्या आत्पकालीन घटनांसाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मदतीसाठी असलेल्या शासकीय यंत्रणेचा खोडसाळपणे गैरवापर करून पोलिसांना विनाकारण धावपळ करायला लावल्याप्रप्रकरणी पोलिसांनी या कॉलरविरोधात कडक पाऊल उचलले आहे. सातपूर पोलिस ठाण्याचे अंमलदार चव्हाण (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात मोबाईलधारकाचा शोध सुरू
मागील काही दिवसांत शहरात पोलिसांना खोट्या गुन्ह्यांची माहिती देऊन संभ्रम निर्माण करण्याची ही दुसरी घटना घडली आहे. अशा प्रकारांमुळे खऱ्या गरजूंपर्यंत वेळेत मदत पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. या गंभीर बाबीची दखल घेत सातपूर पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाच्या मालकाचा माग काढण्यास सुरुवात केली असून, किशोर बेंडकुळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.