
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू
पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज अपघातांमध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. अशातच आता आणखी एक अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भूमकर पूल परिसरात घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह तिघे जण जखमी झाले आहेत.
अमरजा गोपाळ हांडे (वय ३७, रा. गोकुळनगर, वारजे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार साहिल सुनील कवडे (वय २२, रा. लिपाणे वस्ती, जांभुळवाडी, आंबेगाव) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अमरजा यांची मुलगी अस्मिता (वय १७) हिने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता, तिची आई अमरजा आणि भाऊ हे ९ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून निघाले होते. नऱ्हे परिसरातील भूमकर पुलाजवळ साहिल कवडे हा भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने अस्मिताच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अमरजा आणि त्यांचा मुलगा जखमी झाले, तर अमरजा आणि कवडे यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान अमरजा यांचा मृत्यू झाला. अपघातात कवडे गंभीर जखमी झाला असून अस्मिता आणि तिच्या भावालाही दुखापत झाली आहे. भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तूपसौंदर करत आहेत.
दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू
गेल्या काही दिवसाखाली दिवे घाटात झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. सोमवारी मध्यरात्री हा अपघात झाला आहे. सुंदर कैलास गंगावणे (वय ३८, रा. उंड्री-पिसोळी) व अनन्या सुंदर गंगावणे (वय १२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, अपघातात सोहम सुंदर गंगावणे जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रक चालक हनुमंत बाबूराव मलकापुरे (वय ३२, रा. नागेवाडी, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अश्विनी उत्तम पवार (वय ३०, रा. कमलविहार सोसायटी, धनकवडी) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.