
तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनेरसर येथील एका इंजिनिअरिंग कंपनीसमोर जमीन विकसनाचे काम सुरू असताना संशयित आरोपींनी कंपनीचे अधिकारी सुंदरम यांच्याशी कामावरून वाद घातला. परिस्थिती चिघळू नये म्हणून शेखर तांबे यांनी मध्यस्थी करत अधिकाऱ्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले आणि वाद शमविण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी सिद्धार्थ झोडगे याने “तुला खूप माज आला आहे, आम्हालाच येथे काम करायचे आहे,” असे म्हणत शिवीगाळ करत लाकडी काठीने तांबे यांच्या पाठीवर व डाव्या खांद्यावर प्रहार केला. जय चौधरी याने तोंडावर मारहाण करून त्यांना खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर दगडाने डोक्यावर प्रहार केल्याने तांबे गंभीर जखमी झाले.
या हल्ल्यात मनोज मकाळे, कमलेश दौंडकर, संकेत दौंडकर, स्वागत माशेरे (रा. कनेरसर, ता. खेड), जय चौधरी (रा. पाबळ, ता. शिरूर) तसेच इतर १० ते १५ अज्ञात व्यक्तींचा सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खेड पोलीस यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १४३ (बेकायदेशीर जमाव), ३२३ (स्वेच्छेने दुखापत), ३२४ (घातक शस्त्राने दुखापत), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
हे सुद्धा वाचा : घटस्फोटांच्या प्रकरणांत लक्षणीय वाढ; धक्कादायक कारण जाणून घ्या सविस्तर
…म्हणून टोळीयुद्धाच्या घटना
खेड तालुक्यातील एसईझेड प्रकल्प परिसरात नव्या कंपन्यांमधील ठेकेदारी कामे मिळवण्यासाठी यापूर्वीही टोळीयुद्धाच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांत खुनाच्या घटनाही समोर आल्या असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेला मोठे प्रयत्न करावे लागत आहेत.