संग्रहित फोटो
बारामती : राज्यात गेल्या काही वर्षांत घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये या प्रकरणांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कौटुंबिक न्यायालयांवरील ताणही वाढला आहे. विशेष बाब म्हणजे ग्रामीण भागात देखील घटस्फोटांचे प्रमाण वाढू लागले आहे, ही मोठी चिंतेची बाब आहे.
पुणे कौटुंबिक न्यायालयाच्या आकडेवारीनुसार, २०२६ या वर्षाच्या पहिल्या दीड महिन्यातच सुमारे ४४५ घटस्फोट अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी जवळपास ३५० अर्ज परस्पर संमतीने दाखल झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी २०२५ मध्ये पुण्यात एकूण २,३८० प्रकरणांची नोंद झाली होती. यंदाच्या सुरुवातीच्या आकडेवारीवरून प्रकरणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बदलती जीवनशैली, करिअरकेंद्री दृष्टिकोन, वाढती आर्थिक स्वावलंबनाची भावना आणि नातेसंबंधांमधील संवादाचा अभाव ही वाढीची प्रमुख कारणे आहेत. लहान- सहान वाद, मतभेद आणि अहंकार यांमुळे तणाव वाढून नात्यात दुरावा निर्माण होत असल्याचे समुपदेशक सांगतात. याशिवाय मानसिक व शारीरिक छळ, व्यसनाधीनता, विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक वाद यांसारखी पारंपरिक कारणेही मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. महिलांमध्ये कायदेशीर हक्कांविषयी वाढलेली जागरूकता आणि सामाजिक बंधनांमधील शिथिलता यामुळे अन्याय सहन करण्याऐवजी कायदेशीर मार्ग स्वीकारण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परिणामी, परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.
कुटुंब व्यवस्थेतील बदल आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला मिळणारे वाढते महत्त्व याचा थेट परिणाम विवाहसंस्थेवर होत आहे. घटस्फोटाचे प्रमाण वाढत असले तरी, अनेक जोडपी समुपदेशनाद्वारे नाते टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे. राज्यातील घटस्फोटांची वाढती संख्या ही केवळ कायदेशीर बाब नसून, सामाजिक बदलाचे द्योतक मानली जात आहे. कौटुंबिक मूल्ये जपण्यासाठी संवाद, समजूतदारपणा आणि परस्पर आदर यांना अधिक महत्त्व देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान लग्न झाल्यानंतर एक महिन्याच्या आत घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल झाल्याची अनेक उदाहरणे देखील आहेत.
सोशल मिडियाचा अतिरेकी वापर महिला व पुरुषांमध्ये होत आहे, या अभासी माध्यमातून एकमेकांना पाठवल्या जाणाऱ्या संदेशेच्या माध्यमातून अनोळखी व्यक्ती एखाद्याला जवळची वाटते. त्यातून विवाहबाह्य संबंध वाढत आहेत, त्यातूनच घटस्फोटाचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्याचबरोबर पती-पत्नीने एकमेकांना समजून घेतले पाहिजे. एकमेकांना आदर देत, एकमेकांच्या आई वडील व सदस्यांचा आदर केला पाहिजे. समजूतदारपणा दोघांमध्येही असायला हवा, तरच पती-पत्नीचे नाते शेवटपर्यंत टिकेल. – ॲड रेश्मा लोणकर,बारामती.






