
भोंदूबाबा प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी
राज्याच्या गृह विभागावर केला आरोप
निवडणूकीच्या भीतीने उशीरा तपासला सुरूवात
कणकवली: भोंदू अशोक खरात याच्याबाबत पीडित महिलेने वर्षभरापूर्वी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र त्याचा तपास पाच-सहा महिन्यांपूर्वीच झाला होता. परंतु या सरकारमध्ये जे काही दोन तीन पक्ष सहभागी आहेत, त्या पक्षातील अनेक लोक या भोंदू बावामळे अडचणीत येणार होते. म्हणून गृह विभागाने नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास लोकांपुढे आणण्याचे काम केले आहे, असा आरोप उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. याबाबतच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षातील लोकांना वाचविण्यासाठी या प्रकरणाचा तपास उशिरा केला की काय, याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे, कारण या प्रकरणात अनेक राजकीय लोक सहभागी असल्याचे पुढे येत आहे.
निवडणुकांपूर्वी हे प्रकरण उघड झाल् असते तर, या प्रकरणामुळे जनतेमध्ये सरकारबद्दल रोष निर्माण होणार होता. त्यामुळेच भोंदूबाबा खरात याचे प्रकरण निवडणुकीनंतर पद्धतशीरपणे बाहेर काढत की काय, अशी शंका जनतेमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, असेही नाईक यांनी म्हटले आहे.
भोंदूबाबा अशोक खरातवर उद्धव ठाकरेंकडून लाभाची खैरात; शेतकऱ्यांसाठीचे पाणी ‘शिवनिका’ संस्थेकडे वळवले
अशोक खरातवर उद्धव ठाकरेंकडून लाभाची खैरात
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे रोज नवे कारनामे समोर येत आहेत. खरातच्या राजकीय संबंधांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी यापूर्वीच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळातही खरातवर लाभांची खैरात केल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वळवून खरातच्या संस्थेला देण्यात आल्याचा आरोप आता होत आहे.
अशोक खरातच्या या वाढत्या प्रभावाचा फायदा त्याला थेट शासकीय निर्णयांमध्येही झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या ‘श्री शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष असलेल्या खरातसाठी दारणा धरणातून ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. ३१ जुलै २०२० रोजी यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते. शेतकऱ्यांसाठी असलेले पाणी खासगी संस्थानाला वळवण्यात आल्याचा आरोप यामुळे अधिकच बळकट झाला आहे.