
महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
शिरवळ : कामशेत येथून महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांच्या कारला शिरवळजवळ भीषण अपघात झाला. सातारा-पुणे महामार्गावर हॉटेल शिवालयसमोर मंगळवारी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत चार तरुणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पुणे-सातारा दिशेने जाणारी टाटा नेक्सॉन कार शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार डिव्हायडरला जोरदार धडकली. त्यानंतर कारने तब्बल चार ते पाच पलट्या घेतल्या आणि सातारा-पुणे दिशेने जाणाऱ्या महामार्गाच्या शेवटच्या लेनमध्ये जाऊन पडली. त्याचवेळी कारची समोरून येणाऱ्या अशोक लेलँड ट्रकला धडक झाली. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात वेदान्त अर्जुन वारिंगे (वय १९, रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धिरेद्र ठाकूर (वय १९, रा. कामशेत), आदित्य बाळासाहेब गरुड (वय १९, रा. टाकवे, ता. मावळ) आणि निखील बाळू राऊत (वय २०, रा. कामशेत) यांचा मृत्यू झाला. तर दिक्षीत दयानंद पुजारी (वय २०, रा. कामशेत) आणि मयुर हनुमंत शिंदे (वय २०, रा. बऊर, कामशेत) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मित्र लहानपणापासून एकत्र होते. महाबळेश्वरला फिरण्यासाठी मित्रांचा हा प्रवास सुरू झाला होता. मात्र, शिरवळजवळ झालेल्या भीषण अपघातामुळे आनंदाच्या प्रवासाचे रूपांतर दुःखद घटनेत झाले. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
अपघाताची माहिती मिळताच सारोळा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.
जळगावातही भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, जळगाव शहरात घडलेल्या एका भीषण अपघाताने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहराबाहेरून जड वाहतूक जावी आणि शहरातील रस्ते मोकळे राहावेत, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या बायपास मार्गावरील उड्डाणपूल बंद पडल्याने मोठी वाहने पुन्हा शहरातून धावू लागली. याच बदललेल्या वाहतूक व्यवस्थेचा फटका एका कष्टकरी महिलेला बसला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सेनगाव–रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू