
परिक्षेत ChatGPT चा वापर अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन, मिड-सेमिस्टर परीक्षा पुढे ढकलल्या
IIT बॉम्बेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसा सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान संबंधित विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन वापरताना आढळला. त्याने प्रश्नपत्रिका ChatGPT वर अपलोड करून उत्तरे शोधल्याचे संस्थेने म्हटले आहे.
या प्रकारानंतर विद्यार्थ्याविरोधात कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती, असेही संस्थेने स्पष्ट केले. संबंधित शिक्षक आणि विभागप्रमुखांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला. या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्याला देण्यात आल्याचे संस्थेच्या निवेदनात म्हटले आहे.
यानंतर विद्यार्थी आपल्या हॉस्टेलच्या खोलीत परतला. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी तो खोलीत मृतावस्थेत आढळला. पवई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. विद्यार्थ्याच्या मृत्यूमागील नेमक्या परिस्थितीची चौकशी करण्यात येत आहे.
परीक्षेतील घटनेनंतर काही तासांतच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असला तरी, या दोन घटनांमध्ये थेट कारणपर संबंध असल्याचे अधिकृत तपासातून अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्याने हे पाऊल नेमके का उचलले, याबाबत निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
विद्यार्थ्याच्या मृत्यूची माहिती कॅम्पसमध्ये पसरल्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र आले. ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी IIT बॉम्बेच्या मुख्य इमारतीजवळ आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करत घोषणाबाजी केली.
आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. IIT बॉम्बेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी रात्री विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर विद्यार्थ्यांना मुख्य इमारतीसमोरील कन्व्होकेशन हॉलमध्ये नेण्यात आले.
या घटनेनंतर सुरू असलेल्या मिड-सेमिस्टर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमधील मानसिक आरोग्य, शैक्षणिक ताण आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सहाय्य व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले. आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांनी प्राध्यापक आणि प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याविषयी अधिक संवेदनशील होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. केवळ ‘ताण घेऊ नका’ असे सांगण्याऐवजी विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रभावी व्यवस्था असावी, अशी मागणीही करण्यात आली.
IIT बॉम्बेने विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या घटनेमुळे प्रभावित झालेले मित्र, वर्गमित्र, शिक्षक आणि इतरांना आवश्यक मदत दिली जात असल्याचे संस्थेने म्हटले आहे. संबंधित अधिकारी विद्यार्थ्याच्या मृत्यूशी निगडित परिस्थितीची चौकशी करत आहेत.
दरम्यान, विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये विद्यार्थी मानसिक आरोग्य आणि शैक्षणिक दबावा संदर्भातील चर्चा पुन्हा केंद्रस्थानी आली आहे. पोलिस आणि संबंधित यंत्रणांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील परिस्थिती अधिक स्पष्ट होऊ शकणार आहे.
IIT Bombay : टेक प्रोफेशनल्ससाठी खूशखबर! IIT बॉम्बेकडून ‘हा’ नवीन डिप्लोमा कोर्स सुरू..