
चुलत भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट; पत्नीची हत्या करून भांगेत सिंदूर भरला, नंतर पती पण गळफासावर..
ही घटना बर्रा-7 येथील एसएस ब्लॉकमधील भाड्याच्या घरात घडली. काही दिवसांपूर्वीच हे दाम्पत्य येथे राहण्यासाठी आले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पतीने पत्नीची हत्या करून त्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता, खोलीच्या जमिनीवर सिंदूर विखुरलेला आढळला. तसेच सिंदूराची डबीही जवळ पडलेली होती. मृत महिलेच्या भांगेत सिंदूर भरलेला होता, तर तरुणाच्या हात-पायांवरही सिंदूराचे डाग आढळले. यावरून पत्नीची हत्या केल्यानंतर तिच्या भांगेत सिंदूर भरून पतीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृतांची ओळख 22 वर्षीय सौरभ सविता उर्फ टोनी आणि 18 वर्षीय राणी उर्फ शालिनी अशी झाली आहे. दोघेही नात्याने चुलत भाऊ-बहिण असल्याचे तपासात समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा विरोध असतानाही त्यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी घर सोडून कोर्ट मॅरेज केले होते.
लग्नानंतर दोघे काही काळ दिल्लीत राहत होते. त्यानंतर सुमारे पाच दिवसांपूर्वी ते कानपूरला परतले आणि बर्रा-7 परिसरातील एका होजरी व्यावसायिकाच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर भाड्याने राहू लागले होते.
मंगळवारी दुपारी दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने छतावर कपडे वाळत घालण्यासाठी जात असताना रोशनदानातून खोलीत डोकावले. त्यावेळी तिला पंख्याला लटकलेला तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी तातडीने घरमालकाला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.
घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिक पथकाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत प्लास्टिकच्या चटईवर महिलेचा मृतदेह पडलेला होता, तर तरुणाचा मृतदेह साडीच्या सहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
मृत राणीची आई पिंकी यांनी सांगितले की, घटनेच्या काही वेळापूर्वीच त्यांची मुलगी आणि जावयाशी फोनवर बोलणे झाले होते. त्यावेळी कोणत्याही वादाची कल्पना आली नव्हती. मात्र, कोर्ट मॅरेजनंतरही सौरभच्या कुटुंबीयांनी राणीला स्वीकारले नव्हते आणि दोघांवर वेगळे होण्यासाठी दबाव टाकला जात होता, असा आरोप त्यांनी केला आहे.
दक्षिण विभागाचे डीसीपी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची शक्यता दिसून येत आहे. मात्र, सर्व बाजूंनी तपास सुरू असून शवविच्छेदन अहवाल आणि नातेवाईकांच्या जबाबांनंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
या प्रकरणात घरमालकाला भाडेकरूंबाबत फारशी माहिती नसल्याचेही तपासात समोर आले आहे. मोटारसायकलच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी सौरभच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. या घटनेनंतर पुन्हा एकदा भाडेकरूंच्या पोलिस पडताळणीच्या प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटणार? कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड; सुरज ठोंबरे टोळीची उडी